संघराज गायकवाड,राहुल आढाव (दौंड प्रतिनिधी) : कुरकुंभ एमआयडीसी येथील विविध कंपन्यांमध्ये काम करणारे अनेक कामगार दौंड शहरात वास्तव्यास असून ते रोज खासगी ट्रान्सपोर्ट गाड्यांमधून कामासाठी ये-जा करतात. या गाड्या कामगारांना आणण्यासाठी व सोडण्यासाठी थेट दौंड शहरातील वर्दळीच्या भागात प्रवेश करत असल्याने शहरातील वाहतुकीवर मोठा ताण निर्माण होत आहे. विशेषतः सरपंच वस्ती आणि शालिमार चौक या परिसरात सकाळी व संध्याकाळी या ट्रान्सपोर्ट गाड्यांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. हे दोन्ही भाग बाजारपेठ आणि दैनंदिन वर्दळीचे केंद्र असल्याने याठिकाणी वारंवार वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
या ट्रान्सपोर्ट गाड्या थेट अरुंद रस्त्यांमध्ये व चौकांमध्ये शिरल्यामुळे दुचाकीस्वार, रिक्षाचालक तसेच पादचाऱ्यांना मोठा अडथळा निर्माण होत आहे. काही वेळा अचानक ब्रेक, वळणं आणि थांबे यामुळे अपघाताचीही भीती व्यक्त केली जात असून शाळकरी मुले व ज्येष्ठ नागरिकांसाठी हा परिसर अधिक धोकादायक ठरत आहे.
सध्या सरपंच वस्ती व शालिमार चौक परिसरात कामगार वाहतूक गाड्यांची वाढलेली ये-जा ही दौंड शहरातील वाहतूक समस्येचे गंभीर कारण ठरत असून, गर्दीच्या भागात अशा मोठ्या वाहनांच्या प्रवेशामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढताना दिसून येत आहे. या संपूर्ण प्रकाराची दखल घेऊन प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) पुणे ग्रामीण तसेच दौंड पोलीस स्टेशन यांनी तातडीने बंदोबस्त व वाहतूक नियोजन करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.






















