गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) :
केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘डिजिटल जनगणना २०२७’ मोहिमेसाठी गेवराई तालुक्यात प्रशासनाने जोरदार तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर तहसीलदार संदिप खोमणे आणि नायब तहसीलदार संजय सोनवणे यांनी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात डिजिटल स्व-गणनेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
यंदा पहिल्यांदाच जनगणना पूर्णपणे डिजिटल पद्धतीने होणार असून १ मे ते १५ मे दरम्यान नागरिकांना स्वतः व आपल्या कुटुंबाची माहिती मोबाईल अॅपच्या माध्यमातून नोंदविता येणार आहे. या प्रक्रियेत एकूण ३३ प्रश्नांची अचूक व पारदर्शक उत्तरे देणे आवश्यक आहे. ‘एक मोबाईल – एक घर’ या संकल्पनेवर आधारित ही नोंदणी सुलभ आणि सुरक्षित असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
जनगणना सुरळीत पार पाडण्यासाठी तालुक्यात ४९५ प्रगणक, ९९ राखीव प्रगणक, ८४ पर्यवेक्षक आणि इतर अधिकारी-कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण प्रक्रिया राबवली जात आहे.
प्रशासनाच्या या उपक्रमामुळे नागरिकांना घरबसल्या सहजपणे जनगणना पूर्ण करता येणार असून, अचूक माहितीमुळे भविष्यातील शासकीय योजना अधिक प्रभावीपणे राबवता येतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.






















