रायगड (प्रतिनिधी असद शेख) : जिल्ह्यातील पेण येथे खड्डे आणि रस्त्यांची दुरवस्था पुन्हा एकदा जीवघेणी ठरली आहे. भोगावती नदीजवळील हनुमान मंदिर परिसरात झालेल्या भीषण अपघातात रिक्षाचालकाचा मृत्यू झाला असून एक प्रवासी गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्याला चुकवण्याच्या प्रयत्नात रिक्षाचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि रिक्षा थेट नदीत कोसळली. या दुर्घटनेत रिक्षाचालक एकनाथ किसन किंजवडे यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेले भूषण पाटील गंभीर जखमी झाले आहेत.
घटनास्थळी असलेल्या पुलावरील खड्डे आणि नादुरुस्त कठडे यामुळे अपघात अधिक गंभीर झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. अपघात इतका भीषण होता की रिक्षाचा पूर्ण चेंदामेंदा झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून रस्त्यांच्या दुरुस्तीकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे ‘खड्डेमुक्त रस्ते’ हा फक्त कागदावरच राहिल्याची टीका आता जोर धरू लागली आहे.






















