गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : वितरण व्यवस्थेवर ताण : काही ठिकाणच्या पंपांवर लावले ‘नो स्टॉक’चे फलक
मार्च-एप्रिल महिना म्हटला की,
ग्रामीण भागात यात्रांचा उत्साह वाढतो. गुढीपाडव्यापासून अक्षय्यतृतीयेपर्यंत चालणाऱ्या या देव-देवतांच्या यात्रा गावोगावी भरतात. परगावी गेलेले लोक गावाकडे परततात; पाहुण्यांची रेलचेल वाढते आणि गोडधोड, तसेच मांसाहारी जेवणाचे बेत आखले जातात. ग्रामीण जीवनातील हा आनंदाचा हंगाम मानला जातो. मात्र, यावर्षी यात्रांच्या या हंगामावर गॅस आणि पेट्रोलटंचाईचे सावट दिसू लागले आहे.
सध्या देशातील अनेक भागांत एलपीजी गॅस आणि पेट्रोलबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही शहरांमध्ये पेट्रोल पंपांवर रांगा लागल्या, तर काही ठिकाणी ‘नो स्टॉक’ फलक लावल्याच्या घटना समोर आल्या आहेत. सरकारकडून पुरेसा साठा
असल्याचे सांगितले जात असले, तरी अफवा, घबराट आणि वाढती मागणी यामुळे वितरण व्यवस्थेवर ताण निर्माण झाला आहे. याचा थेट परिणाम ग्रामीण यात्रांवर होण्याची शक्यता आहे.
नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये…
या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि सरकारने ग्रामीण भागातील गॅस व पेट्रोल पुरवठ्यावर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. यात्रांचा हंगाम लक्षात घेऊन ग्रामीण भागात अतिरिक्त सिलिंडर पुरवठा, पेट्रोल पंपांवर नियोजन, काळाबाजार रोखणे आणि अफवांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. नागरिकांनीही घबराट न करता आवश्यक तेवढाच साठा ठेवावा आणि अफवांवर विश्वास ठेवू नये.
पेट्रोल टंचाईचा परिणामही ग्रामीण यात्रांवर गंभीर ठरू शकतो. यात्रांच्या काळात एसटी, खासगी वाहन, दुचाकी, ट्रॅक्टर, मालवाहतूक यांचीही वर्दळ असते. पेट्रोल-डिझेल सहज उपलब्ध नसेल तर प्रवास खर्च वाढेल, वाहतूक कमी होईल आणि यात्रेतील गर्दी कमी होण्याची शक्यता आहे. परिणामी पैलवानांच्या या यात्रांच्या हंगामामध्ये कुस्ती क्षेत्रावर याचा परिणाम होऊ शकतो.
गणेश थोटे कुस्ती संघटक गेवराई
यात्रांच्या निमित्ताने मित्रमंडळी, नातेवाईक, गावकरी एकत्र येतात. सामाजिक संबंध दृढ होतात आणि गावात एकोपा वाढतो; पण जर इंधन टंचाईमुळे लोक गावाकडे येऊ शकले नाहीत किंवा कार्यक्रम मर्यादित ठेवावे लागले तर या सामाजिक नातेसंबंधांवर परिणाम होऊ शकतो.
श्रीकिसन देवगुडे गावकरी ज्योतिबा उत्सव समिती निपाणी जवळका ता गेवराई जि बीड
यात्रांच्या काळात गावात मोठ्या प्रमाणावर पाहुणे येतात जेवणावळी होतात हॉटेल आणि खानावळी सुरु होतात तसेच वाहतूक वाढते अशा वेळी गॅस आणि पेट्रोलचे टंचाई निर्माण झाली तर यात्रांचा पारंपरिक उत्साह कमी होऊ शकतो प्रशासनाने पुरेसा साठा उपलब्ध आहे असे जरी सांगितले असले तरी गॅसच्या बाबतीत मागणी तसा पुरवठा सध्या तरी नसल्याने सामान्य नागरिक हातबल आहे असे
रामप्रसाद चाळक सरपंच किनगाव ग्रामपंचायत कार्यालय यांनी सांगितले






















