विष्णू गायकवाड ( गेवराई प्रतिनिधी ) : गेवराई तालुक्यात घरकुल योजनेसाठी वाळू वाटपाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या महसूल पथकातील मंडळ अधिकाऱ्यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणी चकलांबा पोलिस ठाण्यात मुख्य आरोपीसह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन परिसरात घरकुल योजनेसाठी वाळू वाटप सुरू आहे. या कामाची पाहणी करण्यासाठी मंडळ अधिकारी दत्तात्रय शेंबडे, तलाठी अनिल काटे आणि तलाठी राजेंद्र साळवे हे महसूल पथकासह ५ मार्च रोजी दुपारी सुमारे १२.३० वाजता राक्षसभुवन येथे गेले होते. पाहणी पूर्ण करून हे अधिकारी दुपारी सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास परतत असताना राक्षसभुवन फाट्याजवळ पाचांळेश्वरकडून येणारा एक हायवा ट्रक त्यांच्या निदर्शनास आला.
संशय आल्याने महसूल अधिकाऱ्यांनी तो हायवा थांबवून चालकाकडे वाळू वाहतुकीचा परवाना व कागदपत्रांची मागणी केली. मात्र चालकाकडे कोणतीही वैध पावती अथवा परवाना आढळून आला नाही. त्यावेळी अचानक एक जीप आणि एक कारमधून आलेल्या काही जणांनी अधिकाऱ्यांशी वाद घालत शिवीगाळ सुरू केली.
यावेळी मुख्य आरोपी स्वप्निल मोटे याने “हायवाला पावती नसते, तुम्ही कोण विचारणारे? आम्ही गेवराईचे पाटील आहोत. तुझे घर मला माहीत आहे, तू गेवराईत कसा येतो ते पाहतो,” असे म्हणत मंडळ अधिकारी दत्तात्रय शेंबडे यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकारामुळे महसूल अधिकाऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली. धमकी व वादाच्या धक्क्यामुळे मंडळ अधिकारी दत्तात्रय शेंबडे यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना तातडीने गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, या घटनेप्रकरणी तलाठी राम जाधव यांनी ६ मार्च रोजी चकलांबा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मुख्य आरोपी स्वप्निल मोटे याच्यासह एकूण आठ जणांविरुद्ध पर्यावरण संरक्षण अधिनियम, खाण व खनिज अधिनियम तसेच सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास चकलांबा पोलिस करत असून वाळू तस्करीविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.






















