जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, सोमवारी सकाळी मानराज पार्क चौफुलीवर झालेल्या भीषण अपघातात २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ओम सुनील गिरी असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेने संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
घटना नेमकी काय?
मिळालेल्या माहितीनुसार, ओम गिरी हा तरुण आपल्या दुचाकीवरून मानराज पार्क चौफुली मार्गे जात असताना पाठीमागून भरधाव येणाऱ्या ट्रकने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, ओम थेट ट्रकच्या चाकाखाली सापडला आणि गंभीर दुखापतीमुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
नागरिकांची धाव, पोलिसांची कारवाई
अपघात होताच परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिक व वाहनधारकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून, मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला.
मृत ओम गिरी हा जळगाव जिल्हा दशनाम गोसावी समाजाचे अध्यक्ष रवींद्र गिरी यांचा पुतण्या असल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे गिरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
वाहतुकीचा खोळंबा
अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.
नागरिकांचा संताप; प्रशासनावर प्रश्नचिन्ह
मानराज पार्क चौफुली हा भाग आता ‘डेथ ट्रॅप’ बनत चालल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांनंतरही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
नागरिकांच्या प्रमुख मागण्या
- तातडीने स्पीड ब्रेकर बसवावेत
- हायटेक सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करावी
- जड वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणावे
वारंवार घडणाऱ्या अपघातांमुळे संतापाची लाट उसळली असून, प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी जोरदार मागणी होत आहे.






















