जळगाव | प्रतिनिधी :(विनोद सुधाकर पवार)
महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघातर्फे समाजातील कुटुंब व्यवस्थेला अधिक सुदृढ व सक्षम करण्याच्या उद्देशाने विवाह, घटस्फोट व पुनर्विवाह या महत्त्वपूर्ण विषयांवर आधारित कौटुंबिक समुपदेशन प्रशिक्षण कार्यक्रम जळगाव येथील श्रीकृष्ण लॉन्स येथे उत्साहात संपन्न झाला. समाजातील बदलत्या परिस्थितीत कुटुंब व्यवस्थेला भेडसावणाऱ्या समस्यांवर मार्ग काढण्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला.
या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी महाराष्ट्र व गुजरात राज्यातून अनुभवी प्रशिक्षक, समुपदेशक तसेच महासंघाचे एकूण सुमारे ९० पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. दिवसभर चाललेल्या या प्रशिक्षणात कौटुंबिक जीवनातील विविध पैलूंवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. विशेषतः विवाहबंधनातील तणाव, घटस्फोटाच्या घटना, तसेच पुनर्विवाहाच्या संधी यासंदर्भात सामाजिक, मानसिक व कायदेशीर दृष्टिकोनातून चर्चा करण्यात आली.
कार्यक्रमात अनुभव कथन, प्रत्यक्ष केस स्टडी तसेच चर्चासत्रांचा समावेश असल्यामुळे उपस्थितांना प्रत्यक्ष जीवनातील समस्यांवर उपाय शोधण्याची दिशा मिळाली. अनुभवी समुपदेशकांनी विविध उदाहरणांच्या माध्यमातून कौटुंबिक समन्वयाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यामुळे उपस्थित सदस्यांना समाजात समुपदेशनाची भूमिका अधिक प्रभावीपणे पार पाडण्यासाठी प्रेरणा मिळाली.
या प्रसंगी लेवा पाटीदार समाजासाठी अभिमानाची बाब ठरलेल्या, नुकत्याच भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS) निवड झालेल्या कु. नंदिनी पाटील (कन्या – श्री. संजीव पाटील व सौ. शिल्पा पाटील, जळगाव) यांचा त्यांच्या आई-वडिलांच्या उपस्थितीत पुणेरी पगडी देऊन भव्य सत्कार करण्यात आला. आपल्या यशामागील परिश्रम व जिद्द याबाबत त्यांनी मनोगत व्यक्त करताना समाजातील युवक-युवतींनी स्पर्धा परीक्षांकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहावे, असे आवाहन केले.
तसेच महासंघाचे सचिव श्री. दिलीप नाफडे यांचे सुपुत्र श्री. अमित नाफडे यांची जागतिक स्तरावर केवळ ३० जणांमधून निवड होऊन त्यांना “एक्युमिन एंजल्स अवॉर्ड” जाहीर झाल्याबद्दल त्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. हा सन्मान श्री. दिलीप नाफडे यांनी स्वीकारला. त्यांच्या या यशामुळे समाजाची मान उंचावली असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्रीकृष्ण लॉन्सच्या संचालिका सौ. जयश्री ताई चौधरी पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले. त्यांनी समाजकार्यासाठी भव्य सभागृह विनामूल्य उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या या योगदानामुळे कार्यक्रम अधिक भव्य आणि यशस्वी ठरला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघाचे अध्यक्ष श्री. अरुण दादा बोरोले यांनी केले. त्यांनी महासंघाच्या सामाजिक उपक्रमांची माहिती देत भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्याचा मानस व्यक्त केला. सूत्रसंचालन कोषाध्यक्ष डॉ. मिलिंद पाटील यांनी केले, तर महिला संयोजिका (खान्देश विभाग) सौ. पुष्पा पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.
एकूणच, समाजातील कुटुंबव्यवस्था अधिक सक्षम, संवेदनशील व समजूतदार करण्याच्या दृष्टीने आयोजित हा प्रशिक्षण कार्यक्रम अत्यंत उपयुक्त व प्रेरणादायी ठरला असून, अशा उपक्रमांची गरज आजच्या काळात अधिक अधोरेखित होत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.






















