माणगाव (प्रतिनिधी जहेंद्र मुंढे) :
आई-वडिलांचे ऋण शब्दांत व्यक्त करणे अशक्य असते, मात्र त्यांच्या स्मृती जपण्याचा आणि समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक सुंदर व भावनिक प्रयत्न गोरेगाव येथील एचपी गॅस व्यावसायिक अमित वसंतराव कांबळे यांनी केला. त्यांच्या आई-वडिलांच्या २५ व्या पुण्यतिथीनिमित्त महाड तालुक्यातील कोंडीवते येथील स्वराज्य निवारा वृद्धाश्रमात अन्नदानाचा अर्थपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या प्रसंगी आरपीआयचे महाड तालुका अध्यक्ष मोहन खांबे, सचिव लक्ष्मण जाधव, पत्रकार नवनाथ लोकरे, गोरेगावचे उद्योजक किशोर म्हसकर, महाडचे प्रसिद्ध वकील भिसे साहेब, तसेच अमित गॅस एजन्सीचे मॅनेजर रामस्वरूप तोडाणी, कर्मचारी राकेश खिचड आणि यश हॉटेलचे मालक यश कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या उपक्रमांतर्गत एकूण ३८ वयोवृद्धांना दोन्ही वेळचे अन्नदान करण्यात आले. त्यामध्ये २३ पुरुष व १५ महिला लाभार्थींचा समावेश होता. सर्वांना प्रेमाने व सन्मानाने भोजन देण्यात आले. अनेक वृद्धांनी या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना “आज आम्हाला आपल्या घरच्यांची आठवण झाली,” अशा भावना व्यक्त केल्या. त्यामुळे वातावरण अत्यंत भावनिक झाले होते.
अमित कांबळे यांनी यावेळी सांगितले की, आई-वडिलांनी दिलेल्या संस्कारांमुळेच आज आम्ही समाजात उभे आहोत. त्यांच्या पुण्यतिथी निमित्त केवळ विधी न करता, समाजातील गरजू घटकांसाठी काहीतरी करावे, ही भावना मनात होती. वृद्धाश्रमातील ज्येष्ठांची सेवा हीच खरी त्यांना श्रद्धांजली आहे.
या उपक्रमातून समाजाला एक सकारात्मक संदेश देण्यात आला-आई-वडिलांच्या स्मृती फक्त पूजा-अर्चा किंवा विधींमध्ये न अडकता, समाजोपयोगी कार्यातून जपल्या तर त्याचे खरे सार्थक होते. आजच्या धावपळीच्या जीवनात वृद्धांची काळजी घेणे ही केवळ कर्तव्य नव्हे, तर एक सामाजिक जबाबदारी आहे, याची जाणीव या कार्यक्रमातून प्रकर्षाने झाली.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी अमित कांबळे यांच्या या उपक्रमाचे कौतुक करत, अशा सामाजिक उपक्रमांची गरज आजच्या काळात अधिक असल्याचे मत व्यक्त केले.






















