गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : तालुक्यात सोमवारी सायंकाळी वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. दिवसभर प्रचंड उष्णता जाणवत असताना सायंकाळी अचानक वातावरणात बदल होऊन ढगाळ स्थिती निर्माण झाली आणि सुमारे सायंकाळी ६.३० वाजल्यानंतर वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. या अचानक बदललेल्या हवामानामुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
वादळी वाऱ्यामुळे तालुक्यातील अनेक भागात झाडे उन्मळून पडली असून वीजवाहिन्यांचे नुकसान झाल्याने शहरासह ग्रामीण भागातील वीजपुरवठा विस्कळीत झाला. अनेक ठिकाणी तासन्तास वीज खंडित राहिल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला.
या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला असून काढणीच्या अवस्थेतील रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गहू, ज्वारी, हरभरा, कांदा आदी पिकांवर पावसाचा व वाऱ्याचा प्रतिकूल परिणाम झाला आहे. तसेच आंबा व मोसंबी फळबागांनाही फटका बसला आहे. जोरदार वाऱ्यामुळे उभी पिके आडवी पडली असून, कापणी करून शेतात ठेवलेला कडबा व कुट्टीही भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
हवामान विभागाने यापूर्वीच विजांच्या कडकडाटासह वादळी वारे व गारपिटीची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार तालुक्यात हवामानात अचानक बदल दिसून आला. काही दिवसांपूर्वीही अवकाळी पावसाने हजेरी लावली होती, त्यानंतर पुन्हा एकदा झालेल्या पावसामुळे शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे.
दरम्यान, नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. पुढील काही तास हवामान अस्थिर राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.






















