जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : दि. १ जून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जाहीर झालेले अनुदान तातडीने वितरित करावे, अन्यथा आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा देणारे निवेदन आज जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांना देण्यात आले.
शेतकरी प्रतिनिधींनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही अनुदानाचा लाभ मिळालेला नसल्याची बाब निदर्शनास आणून दिली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांनी संबंधित विषयाची दखल घेत लवकरात लवकर निधी वितरित करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
तसेच महसूल अधिकारी अंगद कासटकर यांची भेट घेऊन या विषयात विशेष लक्ष घालण्याची मागणी करण्यात आली. कासटकर यांनी जामनेर तहसीलदार यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून पुढील आठ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
यावेळी शेतकरी आंदोलक सुभाष ठोंबरे, अविनाश पाटील, गोपाल कदम, समाधान चौधरी, प्रकाश ठोंबरे, अशोक ढगे, रामचंद्र पवार, अजय मराठे व विशाल भगत उपस्थित होते






















