जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :
जळगाव ते छत्रपती संभाजीनगर या महत्त्वाच्या मार्गावर ‘खान्देश एक्सप्रेस वे’ उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला असून, या प्रकल्पामुळे उत्तर महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रस्तावित एक्सप्रेस वे समृद्धी महामार्गाशी जोडला जाणार असल्याने प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सोयीस्कर होणार आहे.
या महामार्गामुळे जळगाव ते छत्रपती संभाजीनगर दरम्यानचा प्रवासाचा वेळ जवळपास निम्म्यावर येईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. यासोबतच वाहतूक कोंडी कमी होऊन उद्योग, व्यापार आणि पर्यटन क्षेत्राला चालना मिळणार आहे. विशेषतः जळगाव, धुळे आणि आसपासच्या भागातील नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे.
दरम्यान, या प्रकल्पासाठी खानदेश सेनेतर्फे अनेक वर्षांपासून पाठपुरावा करण्यात येत होता. संघटनेचे प्रमुख सुहास दादा बोंडे यांनी 2001 पासून सातत्याने ही मागणी लावून धरली होती. त्यांच्या प्रयत्नांना आता यश येण्याची चिन्हे दिसत असल्याची प्रतिक्रिया स्थानिक स्तरावर उमटत आहे.
राज्य सरकारकडून या प्रकल्पाबाबत प्राथमिक स्तरावरील हालचाली सुरू असल्याची माहिती समोर येत असून, लवकरच यासंदर्भात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. प्रस्तावित ‘खान्देश एक्सप्रेस वे’ पूर्ण झाल्यास खान्देश भागाच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.






















