Times of Maharashtra Desk : मुंबई महानगरपालिकेची आगामी निवडणूक जिंकणे ही फक्त अमित साटम किंवा राहुल नार्वेकर यांची जबाबदारी नसून “ती सर्वांची आहे”, असे विधान राज्याचे कौशल्यविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शुक्रवारी केले. भाजपच्या वर्षपूर्ती मेळाव्यात त्यांनी ही विधान केले आहे.लोढा म्हणाले की, मुंबईत भाजपचा महापौर बसल्यास “आपली कॉलरही टाईट होईल”. मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपच दावा ठोकणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.“अमित साटम अध्यक्ष झाले तेव्हा ते फक्त अमित साटम होते; १०० दिवसांत ते आमच्यासाठी ‘वरचे अमितभाई’ झाले आहेत. कार्यकर्त्याला तिकीट द्या वा नका देऊ, पण काम करण्याचा आनंद वेगळाच असतो,” असेही ते म्हणाले.
“सेना भाजपची आणि सेनापती अमित साटम” लोढा
लोढा पुढे म्हणाले, “अमित साटम मेहनती आहेत. ही त्यांची निवडणूक नसली तरी ते परिश्रमाची पराकाष्ठा करत आहेत. आपली सेना भाजप आहे आणि सेनापती अमित साटम आहेत. महापौर आपला बनवायचा आहे ती आपली धार्मिक जबाबदारी आहे.तसेच मेळाव्यात लोढा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर उधळली स्तुतीसुमने
“देवाभाऊंची १०० रुपं आपण पाहिली आहेत. ते नागपूरचे सर्वात तरुण महापौर झाले. महाराष्ट्रात केवळ भाजप नाही तर इतर पक्ष कसे चालतील हे देखील देवाभाऊच ठरवतात,” असे ते म्हणाले.“गेल्या २५ वर्षांपासून त्यांना पाहतोय. राजकारण कधी आवडतं, कधी नाही; पण कार्यकर्त्यांच्या सुखदुःखात ते तत्पर असतात,” असेही लोढा यांनी नमूद केले आहे
अमित साटम: “मुंबईचा अविश्वसनीय विकास, 54% जनता समाधानी”
मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी यावेळी सरकारच्या कामगिरीबाबत बोलताना सांगितले की,“चार शहरांमध्ये झालेल्या सर्वेक्षणानुसार ७०% लोक सरकारच्या कामगिरीवर समाधानी आहेत.”ते पुढे म्हणाले,“समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण होईल का, याबद्दल प्रश्न उपस्थित होत होते; पण ते वेळेत पूर्ण झाले. अटल सेतू, कोस्टल रोड, बीडीडी, अभ्युदय व मोतीलाल नगर पुनर्विकास — हा विश्वास न बसणारा विकास आहे. मुंबईचे मेट्रो नेटवर्क जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियातील कोस्टल रोडची तुलना मुंबईच्या कोस्टल रोडशी होते.”साटम यांनी मुंबईच्या सुरक्षेसाठी आणि विकासासाठी “भाजपची जबाबदारी आणखी वाढली आहे” असेही म्हटले.






















