निफाड (प्रतिनिधी उत्तम जाधव) : नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील सावरगाव शिवारात एका शेतकऱ्याच्या द्राक्षबागेवर अज्ञातांकडून झालेल्या तोडफोडीच्या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. शंकर साहेबराव कुशारे या शेतकऱ्यांची द्राक्षबाग रात्रीच्या अंधारात काही अज्ञात व्यक्तींनी लक्ष्य केली. या घटनेत केवळ पीक कापूनच न थांबता आरोपींनी क्रूरतेची परिसीमा गाठत सुमारे 800 ते 900 द्राक्षाच्या झाडांची धारदार शस्त्राने कत्तल केली.
याशिवाय शेतातील दोन बोरवेलच्या वायर आणि पाईप कापून टाकण्यात आले. बोरवेलची मोटर चोरीला गेली असून पिण्याच्या पाण्याची टाकीही फोडण्यात आली. त्यामुळे पाण्याची व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. वर्षभर मेहनत घेऊन जोपासलेली बाग काही तासांत उद्ध्वस्त झाल्याने शंकर कुशारे आणि त्यांच्या कुटुंबाला मोठा मानसिक व आर्थिक धक्का बसला आहे.
“आम्ही रात्रंदिवस मेहनत करून हे पीक उभे केले, आमच्या पोटावर पाय देणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे,” अशी भावना कुशारे कुटुंबीयांनी व्यक्त केली. या घटनेमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.
या प्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. मात्र, घटना घडून काही काळ लोटूनही अद्याप कोणालाही अटक न झाल्याने शेतकरी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
ग्रामीण भागात वाढत्या गुन्हेगारीमुळे शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दोषींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून जोर धरत आहे.






















