Times of Maharashtra Desk : ओमान दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मस्कतमधील कार्यक्रमात ‘नमस्कार’ करत आपल्या भाषणाची सुरुवात केली. उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना त्यांनी ओमानमधील भारतीय समुदायाच्या उत्साहाचे कौतुक केले. जागेच्या मर्यादेमुळे कार्यक्रमस्थळी उपस्थित राहू न शकलेल्या, मात्र स्क्रीनवरून थेट कार्यक्रम पाहणाऱ्या सर्व भारतीयांना त्यांनी अभिवादन केले. “मला येथे एक छोटा भारत दिसतो आहे. मल्याळम, तमिळ, तेलगू, मराठी आणि गुजराती भाषा बोलणारे मोठ्या संख्येने येथे उपस्थित आहेत,” असे पंतप्रधान मोदी भाषण देताना म्हणाले.
“समुद्राच्या लाटा आणि ऋतू बदलतात; मात्र भारत आणि ओमानमधील मैत्री नाही- पंतप्रधान मोदी
भारत–ओमान मैत्रीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, “समुद्राच्या लाटा आणि ऋतू बदलतात; मात्र भारत आणि ओमानमधील मैत्री प्रत्येक ऋतूसोबत अधिक मजबूत होत जाते. ही मैत्री प्रत्येक लाटेसोबत नवीन उंची गाठत आहे.” दोन्ही देश एकमेकांच्या संस्कृतीचा सन्मान करतात आणि ही शिखर परिषद दोन्ही देशांच्या प्रगतीला नवी दिशा देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, आज दोन्ही देशांच्या राजनैतिक संबंधांना ७० वर्षे पूर्ण होत आहेत. “आपले संबंध विश्वासाच्या पायावर उभे आहेत. आज घेतले जाणारे ऐतिहासिक निर्णय भविष्यात दूरगामी परिणाम घडवतील,” असे त्यांनी स्पष्ट केले.
सात वर्षांनंतर ओमानला भेट देण्याचा आनंद व्यक्त करताना ते म्हणाले, “आजच्या शिखर परिषदेमुळे भारत ओमान भागीदारीला नवीन दिशा आणि गती मिळेल.”भारत–ओमान भागीदारीच्या भविष्यासंदर्भात बोलताना पंतप्रधान मोदी यांनी नवोपक्रम, आर्थिक सुधारणा आणि सहकार्याच्या संधींवर भर दिला. “प्रत्येक क्षेत्रात नवकल्पनांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. भारताने गेल्या ११ वर्षांत आपला आर्थिक डीएनए बदलला आहे. कामगार कायदे सुलभ करून डझनभर संहिता केवळ चार करण्यात आल्या आहेत,” असे त्यांनी सांगितले.जगभरात अनिश्चिततेचे वातावरण असताना, विविधतेत एकता हा भारतीय संस्कृतीचा पाया असून भारत ओमान संबंध आगामी काळात अधिक बळकट होतील, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.






















