ग्रामस्थांचा अभूतपूर्व प्रतिसाद; शाळेपासून वेशीपर्यंत स्वच्छता
जळगाव प्रतिनिधी विनोद पवार : भारतीय प्रजासत्ताक दिन आणि निर्भय सेवा समितीच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या भव्य स्वच्छता मोहिमेला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. समितीच्या या हाकेला साद देत आबालवृद्धांनी हाती झाडू घेतला आणि अवघे गाव स्वच्छ केले.
या मोहिमेची सुरुवात गावातील शाळेपासून झाली आणि ती गावाच्या शेवटच्या टोकापर्यंत राबविण्यात आली. या महास्वच्छता अभियानात गावातील रस्ते, सार्वजनिक ठिकाणे आणि कोपऱ्याकोपऱ्यात साचलेला कचरा हटवून गावाला स्वच्छतेचा नवा चेहरा देण्यात आला. विशेष म्हणजे या उपक्रमात केवळ तरुणच नव्हे, तर महिला, ज्येष्ठ नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांनीही हिरिरीने सहभाग नोंदवत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले.
स्वच्छतेमुळे गावाचे सौंदर्य तर वाढलेच, शिवाय सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीनेही हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. निर्भय सेवा समितीच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. भविष्यातही गावाच्या विकासासाठी अशा उपक्रमांना खंबीर पाठिंबा देण्याचा निर्धार यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केला.



















