पालघर (प्रतिनिधी निलेश गावंडे) :
पालघर जिल्ह्यातील उमरोळी येथे २९ एप्रिल २०२६ रोजी घडलेल्या भीषण अपघातात आपदा मित्र आणि आपदा सखी यांच्या तत्परतेमुळे एका जखमी व्यक्तीचा जीव वाचल्याची हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. क्रिकेट मैदानाजवळील वळणावर चारचाकी आणि दुचाकी यांच्यात जोरदार धडक झाली होती. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन रस्त्यावर पडला होता.
अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती, मात्र जखमीला मदत करण्यासाठी कोणीही पुढे येत नसल्याचे दुर्दैवी चित्र दिसून आले. अशा परिस्थितीत पालघरहून घरी परतत असलेल्या आपदा सखी प्रिया पाटील यांच्या निदर्शनास ही घटना आली. त्यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ आपले वाहन थांबवले आणि परिस्थितीचा आढावा घेत मदतकार्य सुरू केले.
त्यांच्यासोबत असलेले आपदा मित्र ओमकार नाईक, आपदा सखी सानिया संखे, सिमरण संखे आणि अपेक्षा संखे यांनीही तत्परतेने सहकार्य करत जखमीस प्रथमोपचार दिले. जखमीच्या तुटलेल्या पायाला आधारफळी लावून त्याला सुरक्षितपणे रिक्षामधून बोईसर येथील टिमा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या घटनेतून केंद्र शासनाच्या ‘आपदा मित्र-आपदा सखी’ प्रशिक्षणाचा प्रत्यक्षात किती प्रभावी उपयोग होतो, याचे उत्तम उदाहरण पाहायला मिळाले. योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने दिलेल्या मदतीमुळे जखमीचा जीव वाचवण्यात यश आले.
या धाडसी आणि मानवतावादी कार्याबद्दल संबंधित आपदा सखी आणि आपदा मित्र यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. नागरिकांनीही अशा प्रशिक्षणाच्या महत्त्वावर भर देत अधिकाधिक लोकांनी यात सहभागी व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.






















