सिन्नर(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), सिन्नर यांच्या वतीने आयोजित क्षेत्रीय किसान गोष्टी कार्यक्रम व फार्मर कप स्पर्धेचा शुभारंभ सोमवारी (दि. २९) उत्साहपूर्ण वातावरणात झाला. राज्यस्तरीय उद्घाटन कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.
कार्यक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, अभिनेते आमिर खान, कृषी सचिव परिमल सिंह व कृषी आयुक्त सूरज मांढरे यांच्या डिजिटल उपस्थितीत झाला. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी भटू पाटील, तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर नाठे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक गोकुळ जाधव, कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारी तसेच सिन्नर तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविकात भटू पाटील यांनी आत्मा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध कृषी उपक्रमांची माहिती देत शेतकऱ्यांनी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पादनवाढ साधावी, असे आवाहन केले. विशेष संशोधन सहाय्यक डॉ. भरत मालुंजकर यांनी बीज प्रक्रिया, दर्जेदार बियाण्यांची निवड, नैसर्गिक शेती, बीबीएफ पद्धतीने पेरणी, हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर पीक व्यवस्थापन आणि उत्पादन खर्चात बचत याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
राज्यस्तरीय कार्यक्रमात शाश्वत शेती, नैसर्गिक शेतीचा प्रसार, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले. फार्मर कप स्पर्धेमुळे शेतकऱ्यांमध्ये ज्ञानाची देवाणघेवाण व नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा प्रसार होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमास तालुक्यातील विविध गावांतील महिला व पुरुष शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सूत्रसंचालन कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले. तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर नाठे यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.



















