मुंबई प्रतिनिधी :- बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर बोकड वाहतूक करणाऱ्या गरीब शेतकरी व ग्राहकांवर पोलीस आणि आरटीओ प्रशासनाकडून होत असलेल्या कारवाईविरोधात महाराष्ट्र राज्य मुल्ला मुलाणी समाजाचे अध्यक्ष शाहरुख मुलाणी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना ई-मेलद्वारे निवेदन पाठवून तात्काळ हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दि. 28 मे 2026 रोजी देशभरात बकरी ईद साजरी होणार असून राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील हजारो गरीब शेतकरी वर्षभर मेहनत करून शेळीपालन व बोकड पालन करतात. वर्षातून एकदाच हे शेतकरी मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये बोकड विक्रीसाठी आणतात. मात्र, पोलीस व आरटीओ प्रशासनाकडून अशा वाहनांवर मोठ्या प्रमाणात कारवाया करून वाहने जप्त केली जात असल्याने शेतकरी वर्गामध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आरटीओ प्रशासनाकडून जनावरे वाहतुकीसाठी विशेष परवान्याची अट घालण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, केवळ आठवडाभराच्या वाहतुकीसाठी संपूर्ण वर्षाचा परवाना काढणे गरीब शेतकऱ्यांना शक्य नसल्याचे मुलाणी यांनी नमूद केले. शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून जप्त केलेल्या शेतकऱ्यांच्या वाहनांवर नाममात्र ₹1000 दंड आकारून ती तात्काळ सोडावीत, तसेच ग्राहकांच्या वाहनांवर ₹300 दंड आकारून कारवाई थांबवावी, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी शाहरुख मुलाणी म्हणाले, “शासन एकीकडे शेळीपालनासाठी अनुदान देते, तर दुसरीकडे त्याच शेतकऱ्यांना कायद्याच्या नावाखाली त्रास दिला जात आहे. गरीब शेतकरी वर्षभर मेहनत करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतो. बकरी ईद निमित्त मुंबई व इतर मेट्रो शहरांमध्ये विक्रीसाठी आणले जाणारे बोकड हे राजस्थान, गुजरात आणि मध्यप्रदेशमधील गोरगरीब शेतकऱ्यांचे असतात. या व्यापारातून मिळणाऱ्या उत्पन्नावरच त्यांच्या मुलांचे शिक्षण, विवाह, शेतीचा खर्च आणि संसार अवलंबून असतो.”
पोलीस व आरटीओ प्रशासनाने मानवीय दृष्टीकोन ठेवून कारवाई करावी, अन्यथा समाजातील वाढत्या नाराजीला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून बोकडांची तपासणी करण्यास कोणतीही हरकत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सदर निवेदनाची प्रत परिवहन आयुक्त, पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग, विविध शेतकरी संघटना, हिंदू खाटीक समाज संघटना तसेच बोकड व्यापारी संघटनांना पाठविण्यात आली आहे.
प्रमुख मागण्या :बकरी ईद निमित्त बोकड वाहतूक करणाऱ्या शेतकरी व ग्राहकांच्या वाहनांवरील कारवाई तात्काळ थांबवावी.
जप्त करण्यात आलेली शेतकऱ्यांची वाहने प्रती वाहन ₹1000 दंड आकारून तात्काळ सोडावीत.
ग्राहकांच्या वाहनांवर केवळ ₹300 नाममात्र दंड आकारून ती वाहने मुक्त करावीत.
पोलीस व आरटीओ प्रशासनाला मानवीय दृष्टीकोन ठेवून कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश द्यावेत.
पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून बोकडांची तपासणी करण्यास कोणतीही हरकत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
“शेतकऱ्यांनी व्यापार करायचा नाही तर कोणी करायचा?”; मुख्यमंत्री व परिवहन मंत्र्यांना निवेदन






















