Times of Maharashtra Desk: यमनमधील बिघडलेल्या परिस्थितीमुळे मध्यपूर्वेत नव्या तणावाची चिन्हे दिसत असून संयुक्त अरब अमीरात (UAE) आणि सौदी अरेबिया यांच्यातील मतभेद उघडपणे समोर येत आहेत. यमनमधील दक्षिणी विभाजनवादी गट सदर्न ट्रान्झिशनल कौन्सिल (STC) ने हदरामौत आणि महरा प्रांतातील मोठ्या भागांवर ताबा मिळवला आहे. या गटाला UAE चे समर्थन असल्याचे मानले जाते.
या घडामोडींनंतर सौदी अरेबियाने UAE वर तीव्र नाराजी व्यक्त करत यमनमधून आपले सैन्य मागे घेण्याची धमकी दिली आहे. याच पार्श्वभूमीवर 1 जानेवारी रोजी अदन विमानतळावर सौदी अधिकाऱ्यांचे विमान उतरू न देण्याची घटना घडली, ज्यामुळे तणाव आणखी वाढला.
UAE अध्यक्षांच्या पाकिस्तान दौऱ्यावरून सौदी नाराज?
UAE चे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांच्या पाकिस्तान दौऱ्यानंतर सौदी युवराज मोहम्मद बिन सलमान (MBS) पाकिस्तानच्या नेतृत्वावर नाराज असल्याचे सांगितले जात आहे. पाकिस्तानी लष्कराचे माजी अधिकारी आदिल राजा यांच्या दाव्यानुसार, MBS यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ किंवा लष्करप्रमुख जनरल आसिम मुनीर यांची भेट घेण्यास नकार दिला.
यमनमध्ये UAE कडून पाठवण्यात आलेल्या शस्त्रसाठ्यावर सौदी हवाई हल्ल्यानंतर शहबाज शरीफ यांनी नूरखान एअरबेसवर UAE अध्यक्षांचे स्वागत केले होते. यामुळे सौदी अधिक चिडल्याचे सांगितले जात आहे.
पाकिस्तानात सत्ताबदलाची हालचाल ?
आदिल राजा यांच्या मते, सध्या पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांची मुलगी मरियम नवाज दुबईत असून ते UAE नेतृत्वाशी चर्चा करत आहेत. मरियम नवाज यांना पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी आणण्यासाठी UAE अध्यक्षांनी पाकिस्तानी लष्करावर दबाव टाकावा, अशी त्यांची इच्छा असल्याचा दावा करण्यात आला आहे.
दुसरीकडे, सौदी युवराज मोहम्मद बिन सलमान यांची भूमिका वेगळी असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या मते, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांची तुरुंगातून सुटका व्हावी, अशी सौदीची इच्छा आहे. या मुद्द्यावरून सौदी आणि पाकिस्तानमधील संबंध तणावपूर्ण बनले आहेत.
पाकिस्तान–सौदी संबंधांवर सावली
अलीकडेच जनरल आसिम मुनीर यांना सौदी अरेबियाकडून सन्मान देण्यात आला होता, मात्र हा सन्मान स्वतः युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी न देता इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते देण्यात आला, याकडेही राजकीय संकेत म्हणून पाहिले जात आहे. एकंदर, यमनमधील संघर्ष, UAE–सौदी तणाव आणि पाकिस्तानातील अंतर्गत राजकारण या तिन्ही गोष्टी एकमेकांशी जोडल्या गेल्याने संपूर्ण प्रदेशातील स्थैर्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.






















