Times Of Maharashtra डेस्क: संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात महत्त्वाची न्यायालयीन घडामोड घडली आहे. या प्रकरणातील सहाही आरोपींवर सत्र न्यायालयाने आरोप निश्चित केले असून २३ फेब्रुवारीपासून खटल्याची नियमित सुनावणी सुरू होणार आहे. त्यामुळे आता या प्रकरणाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
वैष्णवी हगवणे प्रकरण
वैष्णवी हगवणे हिचा मृतदेह १६ मे रोजी भुकूम येथील सासरी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. प्रारंभी आत्महत्येचा संशय व्यक्त करण्यात आला; मात्र शवविच्छेदन अहवालात शरीरावर जखमांच्या खुणा आढळल्याने प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. आत्महत्या की घातपात याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आणि राज्यभरातून संतापाची लाट उसळली.
या प्रकरणात वैष्णवीचे पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे, सासरे राजेंद्र हगवणे, नणंद करिश्मा हगवणे, दीर सुशील हगवणे आणि कुटुंबीय मित्र निलेश चव्हाण यांना अटक करण्यात आली आहे.आरोपींवर हुंडाबळी,आत्महत्येस प्रवृत्त करणे, मानसिक व शारीरिक छळ, कट रचणे आणि पुरावे नष्ट करण्याचे गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. तसेच निलेश चव्हाण याच्यावर वैष्णवीच्या अल्पवयीन मुलाला बेकायदेशीर ताब्यात ठेवणे व कुटुंबीयांना धमकावल्याचा अतिरिक्त आरोप आहे.
आणखी एक हुंडाबळी
१७ मे रोजी वैष्णवीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तपास वेगाने पूर्ण करून जुलै महिन्यात आरोपपत्र दाखल केले. आता सत्र न्यायालयात आरोप निश्चित झाल्याने खटल्याची औपचारिक सुनावणी सुरू होणार आहे.
वैष्णवी आणि शशांक यांचा २८ एप्रिल २०२३ रोजी प्रेमविवाह झाला होता. लग्नानंतर हुंड्यासाठी तिचा सातत्याने छळ होत असल्याचा आरोप तिच्या माहेरच्यांनी केला आहे. याआधीही तिने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आले होते. या पार्श्वभूमीवर २३ फेब्रुवारीपासून सुरू होणारी सुनावणी आणि न्यायालयाचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. वैष्णवीला न्याय मिळावा, अशी राज्यातील जनतेची भावना व्यक्त होत आहे.
















