विष्णू आचार्य (लातूर जिल्हा प्रतिनिधी ) : परिवर्तन संस्था, सुमठाणा आणि जनविकास संस्थेच्या संयुक्त विद्यमाने रेणापूर तालुक्यातील मागासवर्गीय अल्पभुधारक, गायरानधारक शेतकरी तसेच महिला बचत गटांचा एकदिवसीय मेळावा उत्साहात पार पडला. बुधवार (दि.२५) रोजी सकाळी ११ वाजता रेणापूर येथील महिला व बालविकास कार्यालयाच्या सभागृहात या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुभाष चव्हाण होते. प्रमुख मार्गदर्शक व पाहुणे म्हणून नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य डॉ. तातेराव वाघमारे, नागनाथ चव्हाण, विष्णू आचार्य, माधव सिरसाट आणि राहुल गंडले यांची उपस्थिती लाभली. नुकत्याच पार पडलेल्या पंचायत समिती निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल डॉ. तातेराव वाघमारे यांचा अल्पभुधारक व गायरानधारक शेतकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

मेळाव्यात मार्गदर्शन करताना नागनाथ चव्हाण यांनी शेतकऱ्यांनी मोठ्या जमीनदारांची नक्कल न करता रासायनिक शेतीऐवजी सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन केले. सेंद्रिय शेतीमुळे जमिनीची सुपीकता टिकून राहते आणि आरोग्यदायी अन्ननिर्मिती होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. तसेच महिला बचत गटांनी लघुउद्योग सुरू करून स्वयंरोजगाराचा मार्ग स्वीकारावा, यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.
डॉ. तातेराव वाघमारे, माधव सिरसाट, राहुल गंडले आणि सुभाष चव्हाण यांनीही उपस्थितांना शेतीविषयक नवतंत्रज्ञान, शासकीय योजना, बचत गटांची आर्थिक सक्षमता आणि ग्रामीण विकास या विषयांवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंकुश चिकटे यांनी केले, सूत्रसंचालन विष्णू आचार्य यांनी तर आभार प्रदर्शन डिगांबर चव्हाण यांनी केले.
या मेळाव्यास पानगाव, तत्तापूर, गरसुळी, डिगोळ (दे), आरजखेडा, पोहरेगाव आदी गावांतील शेकडो अल्पभुधारक शेतकरी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
मेळाव्यानंतर गायरान जमिनींचे पंचनामे करून १-ई मध्ये नोंद घ्यावी, सरकारी गायरान जमिनीवर असलेल्या घरांची नोंद करून संबंधितांच्या नावावर जागा करावी आदी मागण्यांचे निवेदन रेणापूरच्या तहसीलदारांना देण्यात आले. या मागण्यांमुळे गायरानधारक शेतकऱ्यांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.






















