Times of Maharashtra Desk : फलटण मधील समतानगर येथे मैत्री , जागरूक नागरिकत्व आणि सामाजिक जबाबदारी हे संदेश देणारे चला बुद्धविहारी, आपले संविधान – आपले अधिकार” अभियानाची जल्लोषात सुरवात करण्यात आली आहे.भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीने हे अभियान दर रविवारी राबवण्यात येणार आहे. या उपक्रमाचा उद्देश धम्मविचारांद्वारे समाजात बंधुभाव, समता आणि न्यायाची जाणीव निर्माण करून भारतीय संविधानातील मूलभूत अधिकारांची जाणीव जनसामन्यात पोहोचवणे हा आहे.
या अभियानाची सुरवात परिसरात मंगल मैत्रीची फेरी काढून करण्यात आली. भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी, उपासक-उपासिका, आणि परिसरातील सर्व यांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. या फेरी मध्ये “भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म” हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ग्रंथ आणि भारतीय संविधानाची प्रत ठेवण्यात आली होती. “धम्म आणि संविधान” या दोन आधारस्तंभांच्या माध्यमातून समाजात मंगल मैत्री, जागरूक नागरिकत्व आणि सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला. यानंतर बुद्धविहारात सूत्र पठण करण्यात आले. उपासक-उपासिकांनी भारतीय संविधानाप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्याचे रक्षण आणि संवर्धन करण्याची प्रतिज्ञा घेतली.
यावेळी भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे महासचिव आयु. बाबासाहेब जगताप उपस्थित होते.यामध्ये भाष्य करताना “भारतीय बौद्ध महासभेच्या केंद्र व राज्यस्तरीय २५ कलमी कार्यक्रमांतर्गत धम्मप्रसार, शिक्षण, महिला सबलीकरण आणि संविधान जनजागृती हे प्रमुख उद्दिष्ट आहे. संपूर्ण तालुक्यात ५६ ग्राम शाखा स्थापन करून हे अभियान सातत्याने राबविण्यात येईल.” असे त्यांनी सांगितले.
भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे अध्यक्ष आयु. महावीर भालेराव यांनी देखील अभियानात सहभाग घेत “धम्म आणि संविधान हे सामाजिक परिवर्तनाचे दोन पाय आहेत. प्रत्येक रविवारी बुद्धविहारात येऊन धम्मविचार, सूत्र पठण आणि संविधानाचे अध्ययन करा. पंचशीलाचे आचरण करून आपण समाज परिवर्तनाच्या कार्याला गती देऊ शकतो.” असे मार्गदर्शन उपस्थिताना केले.
या कार्यक्रमात आयु. बजरंग गायकवाड (संस्कार सचिव), अमोल भोसले, चंद्रकांत मोहिते (कार्यालयीन सचिव), विजयकुमार जगताप (तालुका संघटक), तानाजी जगताप (साहित्यिक), प्रवचनकार सोमीनाथ घोरपडे, आयु. चंद्रकांत भोसले, आयु. अविनाश मोरे, आयु. हनुमंत भोसले, आयु. नंदकुमार जगताप, आयु. जगन्नाथ मोरे, आयु. गोरख कांबळे, आयु. प्रणव जगताप तसेच महिला उपासिका व बालक-बालिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.या अभियानाच्या माध्यमातून धम्मविचार आणि भारतीय संविधान मूल्यांचा संगम घडवत, समाजात जागृती आणि बंधुभावाचा संदेश देण्याचा संकल्प फलटण तालुका शाखेने केला आहे.






















