Times of Maharashtra Desk : कोरेगाव भिमा येथे विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी प्रत्येक वर्षी प्रमाणे या वर्षीही योग्य नियोजन सुनिश्चित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत दिले.
बैठकीत बार्टीचे महासंचालक सुनील वारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गिल्ल, पोलीस सहायुक्त सोमय मुंडे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे, तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस विभाग, पीएमपीएल, आरोग्य विभाग, पंचायत राज संस्था आणि अग्निशमन दलाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले की विजयस्तंभ परिसरातील कामांना प्राथमिकता देऊन डागडुजी व दुरुस्ती, फुलांची सजावट, प्रकाशयोजना, स्वच्छता आणि सुरक्षितता सुनिश्चित केली पाहिजे. तसेच, वाढत्या वाहतुकीमुळे वाहनांची कोंडी होऊ नये म्हणून मोठ्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग झोन, छोटे वाहन व दुचाकींसाठी स्वतंत्र जागा, तात्पुरत्या पार्किंगची व्यवस्था, प्रवेश-निर्गमन मार्गांची वेगळी आखणी आणि दिशादर्शक फलक लावण्याचे निर्देशही देण्यात आले.याशिवाय, विजयस्तंभ परिसरात स्वच्छतेसाठी ग्रामपंचायतीच्या सफाई कामगारांची सेवा, पायी येणाऱ्या अनुयायांसाठी सुरक्षित पथ, सावली, पाण्याचे ठिकाणे व विश्रांती सुविधा, तसेच महिला अनुयायांसाठी स्वतंत्र मार्ग, हिरकणी कक्ष व स्वच्छता सुविधा उपलब्ध करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमादिवशी लाखोंची गर्दी लक्षात घेता, मोबाइल टॉयलेट युनिट्स, शौचालयांची संख्या वाढवणे, पिण्याचे स्वच्छ पाणी, कचरा व्यवस्थापनासाठी विशेष पथके, कंटेनर व डम्पर, नियमित संकलन यांची व्यवस्था करावी, असे आदेश देण्यात आले. आरोग्य विभागाला प्राथमिक उपचार केंद्र, डॉक्टर व नर्सिंग स्टाफसह आवश्यक औषधे, रुग्णवाहिका व आपत्कालीन सेवा सतत उपलब्ध ठेवण्यास सांगितले.सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विस्तृत पोलीस बंदोबस्त, राज्य राखीव पोलीस दलाची मदत, संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, २४x७ नियंत्रण कक्ष, वायरलेस यंत्रणा, आपत्कालीन पथके, फायर ब्रिगेड, तसेच ड्रोनद्वारे देखरेख या बाबींसाठी संबंधित विभागांना जबाबदाऱ्या देण्यात आल्या.
अनुयायांच्या सुविधा वाढवण्यासाठी बार्टीतर्फे बुक स्टॉल, माहिती केंद्र व स्वयंसेवकांच्या मार्गदर्शनाची व्यवस्था देखील करण्यात आली.जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की हा ऐतिहासिक आणि राष्ट्रीय महत्वाचा कार्यक्रम असल्याने सर्व विभागांनी स्वतःच्या पातळीवरील तयारी गतीने करून परस्पर समन्वयाने काम करावे, ज्यामुळे अनुयायांना सुरक्षित, सुरळीत व सन्मानपूर्वक वातावरण उपलब्ध होईल.






















