Times of Maharashtra Desk, Pune: पुणे जिल्ह्यात १५ जानेवारी रोजी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना सशुल्क सुट्टी जाहीर करण्यात यावी, अशी मागणी नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI) महाराष्ट्र मीडिया विभागातर्फे करण्यात आली आहे.
NSUIचे महाराष्ट्र राज्य मीडिया विभागाचे अध्यक्ष महेश अनिल कांबळे यांनी यासंदर्भात पुणे जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, लोकशाहीचा कणा असलेल्या निवडणुकांमध्ये मतदान हा प्रत्येक भारतीय नागरिकाचा घटनात्मक हक्क आणि कर्तव्य आहे. मात्र, पुणे जिल्ह्यातील अनेक खासगी, आयटी आणि औद्योगिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या दिवशी सुट्टी दिली जात नाही. त्यामुळे अनेक जागरूक नागरिक मतदानापासून वंचित राहतात.
“मतदान हा केवळ हक्क नसून देशाच्या भवितव्य घडवण्यातील नागरिकांचा सक्रिय सहभाग आहे. प्रत्येक नागरिकाला निर्भयपणे आणि उत्साहाने मतदान करता यावे, यासाठी सरकार, खासगी, आयटी तसेच औद्योगिक क्षेत्रातील सर्व कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी सशुल्क सुट्टी देणे आवश्यक आहे,” असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
या मागणीसंदर्भात महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगालाही प्रत पाठवण्यात आली असून, प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. योग्य निर्णय झाल्यास लोकशाही अधिक बळकट होईल, असा विश्वास NSUIतर्फे व्यक्त करण्यात आला आहे.






















