Times of Maharashtra Desk : पुण्यातील कर्वेनगर परिसरातील गायकवाड चाळ भागात रविवारी (ता. १८) नळाला चक्क मैलामिश्रित पाणी आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पिण्याच्या पाण्यामध्ये सांडपाणी मिसळल्याने संपूर्ण परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, स्थानिक रहिवाशांनी महापालिका प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
काळसर आणि दुर्गंधीयुक्त पाणी कर्वेनगर येथील भुजबळ बंगल्यासमोरील गायकवाड चाळ परिसरात रविवारी सकाळी पाणीपुरवठा सुरू झाला असता, अनेक घरांमधील नळांना काळसर आणि अत्यंत घाण वास येणारे पाणी आले. हे पाणी इतके दूषित होते की त्यात मैल्याचे अंश स्पष्टपणे दिसून येत होते. पिण्यासाठी आलेल्या या पाण्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रोगराईचा धोका आणि आंदोलनाचा इशारा दूषित पाण्यामुळे परिसरात जुलाब, उलटी, ताप आणि त्वचारोगासारखे साथीचे आजार पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. प्रशासनाकडून नागरिकांच्या जीवाशी खेळ होत असल्याचा आरोप करत रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे.”महापालिका प्रशासनाने याची तातडीने दखल घेऊन नवीन जलवाहिनी टाकावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.
तात्पुरती उपाययोजना आणि दुरुस्ती या प्रकाराची माहिती मिळताच स्थानिक नगरसेविका रेश्मा बराटे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या असून, नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून तात्पुरत्या स्वरूपात पाण्याचे जार उपलब्ध करून दिले आहेत. महापालिका प्रशासनाची प्रतिक्रिया याबाबत माहिती देताना पाणीपुरवठा विभागाच्या कनिष्ठ अभियंता अपर्णा देसाई म्हणाल्या, “नागरिकांच्या तक्रारीनंतर आम्ही जलवाहिनीची पाहणी केली आहे. या भागात ड्रेनेज लाइनच्या चेंबरमधून काही नळजोड गेले असून, ते जुने झाल्याने गंजले होते. त्यामुळे दूषित पाणीपुरवठा झाल्याचे निदर्शनास आले आहे. संबंधित नळजोड बंद करण्यात आले असून दुरुस्तीचे काम सुरू आहे. काम पूर्ण होईपर्यंत टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.”
आज सोमवारी (दि. १९) सकाळी पाणीपुरवठा झाल्यानंतर गळतीची नेमकी जागा शोधून पुढील कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.






















