Times Of Maharashtra Desk : नाशिकमधील प्रजासत्ताक दिनाचा सोहळा यंदा केवळ उत्सवापुरता मर्यादित न राहता एका थेट आणि धाडसी प्रश्नामुळे चर्चेचा केंद्रबिंदू ठरला. देशभरात ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना, नाशिकमध्ये मात्र एका महिला कर्मचाऱ्याच्या जाब विचारण्यामुळे कार्यक्रमाला अनपेक्षित वळण मिळाले.
पालकमंत्री गिरीश महाजन प्रजासत्ताक दिनानिमित्त भाषण करत असताना त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याचा आरोप करत वनविभागातील कर्मचारी माधवी जाधव यांनी थेट व्यासपीठासमोर उभे राहून प्रश्न उपस्थित केला. संविधान दिलेल्या महामानवाचं नाव भाषणात का नाही? असा थेट सवाल त्यांनी केला आणि काही क्षणांतच संपूर्ण मैदानात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
या घटनेनंतर पोलिसांनी माधवी जाधव यांना ताब्यात घेतले, मात्र त्यांची भूमिका ठाम आणि निर्भीड होती. मला सस्पेंड केलं तरी चालेल, पण बाबासाहेबांच्या बाबतीत माफी मागणार नाही, असे त्या स्पष्ट शब्दांत म्हणाल्या. त्यांनी सांगितले की, संविधान, लोकशाही आणि प्रजासत्ताक दिन यांचा खरा आधारस्तंभ असलेल्या बाबासाहेबांचे नाव वगळणे ही केवळ चूक नसून गंभीर बाब आहे.
मी वनविभागात काम करते. मला वाळूच्या गाड्या उतरवायला लावल्या, मातीचं काम दिलं तरी मी ते करेन. पण बाबासाहेबांची ओळख पुसली जाऊ देणार नाही, असे भावनिक पण ठाम वक्तव्य त्यांनी माध्यमांशी बोलताना केले. भाषणादरम्यान वारंवार इतर नेत्यांची नावे घेतली जात असताना संविधानाच्या शिल्पकाराचा उल्लेख न होणे याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
या घटनेनंतर नाशिकचा प्रजासत्ताक दिन सोहळा केवळ ध्वजारोहणापुरता न राहता संविधान, मूल्ये आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यावर गंभीर चर्चा घडवून आणणारा ठरला आहे. माधवी जाधव यांच्या धाडसामुळे हा प्रसंग राज्यभर चर्चेत आला असून, प्रजासत्ताक दिनाच्या खऱ्या अर्थावर पुन्हा एकदा प्रकाश टाकला गेला आहे.






















