Times Of Maharashtra Desk : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला भारत सरकारने सन 2026 साठीच्या पद्म पुरस्कारांची घोषणा केली असून, यामध्ये महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा समावेश आहे. कला, साहित्य, समाजसेवा, शेती, वैद्यकीय सेवा आदी क्षेत्रांत भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींना यंदा हा बहुमान देण्यात आला आहे.
लोकनाट्य क्षेत्रात दीर्घकाळ योगदान देणारे ज्येष्ठ लोकनाट्य कलाकार रघुवीर खेडकर यांना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ग्रामीण व लोककलेच्या जतनासाठी त्यांनी केलेल्या कार्याची केंद्र सरकारने दखल घेतली आहे.
तसेच, वारली आदिवासी लोकसंगीत जपणारे आणि लोकप्रिय करणारे संगीतकार भिकल्या लाडक्या धिंडा यांनाही पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. आदिवासी संस्कृती आणि परंपरागत संगीत राष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्यात त्यांचे योगदान मोलाचे मानले जाते.
वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय सेवेसाठी महाराष्ट्रातील डॉ. अर्मिडा फर्नांडीस यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. आरोग्यसेवेत त्यांनी केलेले कार्य प्रेरणादायी ठरले आहे.
याशिवाय, परभणी जिल्ह्यातील प्रगत शेतकरी श्रीरंग लाड यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. कापूस पिकाच्या उत्पादनवाढीसाठी त्यांनी केलेल्या संशोधनात्मक प्रयोगांची दखल घेत केंद्र सरकारने त्यांचा सन्मान केला आहे.
दरम्यान, पद्म पुरस्कार हे भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक मानले जातात. पद्म विभूषण, पद्म भूषण आणि पद्मश्री असे तीन प्रकार या पुरस्कारांचे आहेत. कला, समाजकार्य, विज्ञान, प्रशासन, आरोग्यसेवा, शिक्षण, साहित्य, क्रीडा, उद्योग आणि शेती अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना हा सन्मान प्रदान केला जातो.महाराष्ट्रातील या मान्यवरांच्या यशामुळे राज्याच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि बौद्धिक परंपरेचा गौरव वाढला आहे.






















