आशिष कोटकर ( प्रतिनिधी वरोरा-भद्रावती) : पिपरबोडी-चिनोरा (ता. वरोरा) —येणाऱ्या पुढील चार वर्षांत विविध शासकीय योजनांसह आमदार निधीतून पिपरबोडी-चिनोरा गावात मूलभूत सुविधांसह विविध विकासकामे करण्यात येणार असल्याचे ठाम प्रतिपादन वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राचे आमदार करण देवतळे यांनी केले. ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पिपरबोडी-चिनोरा येथे आयोजित कार्यक्रमात ते उद्घाटक म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाची सुरुवात आमदार करण देवतळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी देशाच्या संविधानिक मूल्यांचे स्मरण करून देत आमदार देवतळे यांनी गावाच्या विकासासाठी रस्ते, पाणीपुरवठा, शैक्षणिक सुविधा, युवकांसाठी क्रीडा सुविधा तसेच सामाजिक पायाभूत सुविधांवर भर दिला जाणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतुल दडमल (अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, पिपरबोडी) होते. प्रमुख अतिथी म्हणून सरपंच ताई परचाके (चिनोरा), उपसरपंच वंदना ढेंगळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळू भोयर, पत्रकार धर्मेंद्र शेरकुरे, तसेच ग्रामपंचायत सदस्य निलेश डोंगरकार, छाया कोल्हेकर, माजी ग्रामपंचायत सदस्य अविनाश ढेंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी देशसेवेसाठी निवड झालेल्या नवनियुक्त बीएसएफ जवान स्वप्निल पवार यांचा जाहीर सत्कार आमदार करण देवतळे आणि आदिवासी हक्क परिषदेचे जिल्हाध्यक्ष धर्मेंद्र शेरकुरे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला. या सत्कारामुळे उपस्थितांमध्ये देशभक्तीची भावना अधिकच बळावली.
यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. देशभक्तीपर गीत, नृत्य व विविध सादरीकरणांमुळे कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षिका शुभांगी सोयाम यांनी केले, तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका विद्या दयासागर मोरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्रिशूल निबुदे, सचिन घोसरे, प्रवीण ज्ञानेश्वर नन्नावरे, जितेंद्र नन्नावरे, प्रमोद घोसरे, राजेश्वर नन्नावरे, नेपाल शेरकुरे आदी सामाजिक कार्यकर्त्यांचे विशेष सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाने गावकऱ्यांमध्ये विकासाबाबत नवी आशा निर्माण केली असून पुढील काळात पिपरबोडी-चिनोरा गावाचा चेहरामोहरा बदलणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.






















