Times Of Maharashtra Desk : मुंबई जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अनुपस्थिती सर्वांनाच भावूक करून गेली. बैठकीच्या सुरुवातीला अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. राज्याचेमुख्य सचिवांनी शोकप्रस्ताव वाचल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी नवनियुक्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची मंत्रिमंडळाशी औपचारिक ओळख करून दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही बैठकीला उपस्थिती होती.
या मंत्रिमंडळ बैठकीत एकूण १९ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यापैकी तीन निर्णय हे दिवंगत अजित पवार यांच्या अखत्यारित प्रस्तावित आणि महत्त्वाचे असल्याने त्यांना प्राधान्य देत तातडीने मंजुरी देण्यात आली.
त्यामध्ये बारामती जिल्हा क्रीडा संकुलासाठी ७५ कोटी १३ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली आहे. या निधीतून कटफळ येथे अत्याधुनिक पॅव्हेलियन, जलतरण तलाव, स्केटिंग रिंग,आर्चरी रेंज आणि बास्केटबॉल मैदान उभारण्यात येणार असून क्रीडा विकासाला मोठी चालना मिळणार आहे.
राज्यातील सिंचन क्षमता वाढवण्यासाठी नाबार्डकडून १५ हजार कोटी रुपयांचे दीर्घ मुदतीचे कर्ज घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामुळे ५७ अपूर्ण सिंचन प्रकल्प आणि १९३ पूर्ण प्रकल्पांच्या वितरण व्यवस्थेत सुधारणा होणार असून सुमारे ८ लाख हेक्टर कृषी क्षेत्राला सिंचन सुविधा मिळणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी आवश्यक शासकीय जमीन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच पुणे जिल्ह्यातील पुरंदर विमानतळ प्रकल्पाला गती देण्यासाठी विशेष हेतू प्राधिकरणाची स्थापना आणि भूसंपादनासाठी ६ हजार कोटी रुपयांच्या कर्जास शासन हमी देणार आहे.
राज्यात माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव अभियान राबवण्यास मंजुरी देण्यात आली असून ग्रामपंचायत ते जिल्हा परिषद स्तरावर पुरस्कार योजना लागू करण्यात येणार आहे. यासाठी दरवर्षी ८० कोटी ७५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
यासह औद्योगिक वसाहती, क्रीडा सुविधा, आरोग्य, शिक्षण, अन्नधान्य वितरण, कर तडजोड, विद्यापीठ कायद्यात सुधारणा अशा विविध क्षेत्रांतील निर्णयांना मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. या निर्णयांमुळे राज्याच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.






















