Times Of Maharashtra Desk : पुण्यामध्ये नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मा.रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पक्षाच्या पुणे शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ही बैठक शहराध्यक्ष संजय सोनवणे आणि पक्षाचे राज्य सचिव बाळासाहेब जानराव यांच्या नेतृत्वाखाली पुणे महानगरपालिकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती.
बैठकीस उपमहापौर परशुराम वाडेकर, नगरसेविका निशा मानवतकर, माजी नगरसेवक संतोष आरडे, सुधीर वाघमोडे, रेणुका चलवादी, जयदेव रंधवे, हुलगेश चलवादी, महिपाल वाघमारे, शाम सदाफुले, टी. आर. तांबोळी, राजेंद्र चुव्हाण, नीलेश रोकडे, सुधीर जगताप, अॅड. भाऊसाहेब गोफणे, लिंबा कावरे, मनीषा मोहिते, कुणाल चावरे, विक्रांत कानडे आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
विजयी उमेदवारांचे अभिनंदन आणि पराभवाची मिमांसाही
बैठकीच्या प्रारंभी नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन करण्यात आले. निवडणुकीत पक्षाचे तीन उमेदवार पराभूत झाले असून, त्यापैकी दोन उमेदवारांचा अवघ्या दोनशे मतांपेक्षा कमी फरकाने पराभव झाला. या पराभवाची सविस्तर कारणमीमांसा करण्यात आली.
तसेच शहरातील संघटनात्मक बळकटीकरण, आगामी निवडणुकांची तयारी, समाजसेवेशी संबंधित विविध प्रकल्प, स्थानिक विकासासाठी नव्या योजनांची आखणी, तसेच पंचवार्षिक कार्यक्रम निश्चित करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत सखोल चर्चा झाली. विशेषतः एसआरए संदर्भातील प्रलंबित प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
सामाजिक ऐक्य आणि पक्ष,संघटन मजबुतीवर भर
सर्व जाती-धर्मातील नागरिकांना एकत्र आणून सामाजिक ऐक्य वाढविणे आणि पक्ष संघटना अधिक सक्षम करणे हेच प्रमुख ध्येय असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. तसेच निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे सर्वाधिकार अध्यक्षांना देण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.



















