विनोद पवार (जळगांव प्रतिनिधी) : जिल्ह्यातील व परिसरातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. पारंपरिक पद्धतीने केळी लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना आता ‘स्मार्ट शेती’ तंत्रज्ञानाचा आधार मिळणार असून, जिल्हा परिषदेच्या पुढाकारातून केळी उत्पादन वाढविण्यासाठी विशेष प्रायोगिक योजना राबविण्यात येणार आहे. 2026-27 या वर्षासाठी ही योजना जाहीर करण्यात आली असून, त्यामुळे केळी उत्पादकांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळणार आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी माहिती देताना सांगितले की, केळी उत्पादनात वाढ आणि गुणवत्तेत सुधारणा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. जळगावची केळी आधीच देश-विदेशात प्रसिद्ध असून, निर्यातक्षम दर्जा आणखी उंचावण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरणार आहे.
स्मार्ट शेती योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये
अचूक सिंचन प्रणाली : हवामान अंदाजावर आधारित पाणी व्यवस्थापन. पिकाला आवश्यक तेवढेच पाणी देण्याची प्रणाली अवलंबली जाणार आहे.
लक्ष्यित फवारणी : संपूर्ण बागेवर औषध फवारणी न करता ज्या ठिकाणी रोग-कीड आहे त्या भागावरच फवारणी करून खर्चात बचत केली जाणार आहे.
मृदविश्लेषण प्रणाली : माती परीक्षणावर आधारित खत व्यवस्थापन आणि ठिबक सिंचनाचा प्रभावी वापर यावर भर दिला जाणार आहे.
निर्यात दर्जा सुधारणा : बंच कव्हर, स्क्रू बॅग व आधुनिक साधनांचा वापर करून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसाठी दर्जेदार उत्पादनावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
तज्ञांचे मार्गदर्शन : कृषी विज्ञान केंद्र, बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ तसेच संबंधित शासकीय यंत्रणांच्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे.
शेतकऱ्यांना होणारे फायदे
खत, पाणी व औषधांच्या वापरात बचत
कीड व रोग नियंत्रण अधिक प्रभावी
उत्पादनात वाढ व गुणवत्तेत सुधारणा
केळीला जागतिक बाजारपेठेत संधी
शाश्वत शेतीकडे वाटचाल
जळगाव जिल्हा केळी उत्पादनासाठी देशभर ओळखला जातो. मात्र बदलते हवामान, वाढते उत्पादन खर्च आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा यामुळे शेतकऱ्यांना नवे तंत्रज्ञान आत्मसात करणे गरजेचे झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेची ही पुढाकारात्मक योजना महत्त्वाची मानली जात आहे.
शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. स्मार्ट शेतीच्या माध्यमातून जळगावची केळी नव्या उंचीवर पोहोचेल, असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी व्यक्त केला आहे.






















