विनोद पवार ( जळगाव प्रतिनिधी ) : भारतामध्ये गेल्या काही दिवसांपासून एलपीजी (घरगुती गॅस) आणि कमर्शियल गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवू लागला आहे. आखाती देशांमधील वाढत्या युद्धपरिस्थितीमुळे खनिज तेल आणि नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यावर परिणाम झाला असून त्याचा परिणाम भारतातील गॅस वितरणावर होत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर आवश्यक सेवांचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात आवश्यक सेवा पुरवठा अधिनियम (ESMA) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिके-इस्रायल-इराण या देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे आखाती भागातील तेल व नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण झाले आहेत. भारत हा मोठ्या प्रमाणात कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू आयात करणारा देश असल्याने या संघर्षाचा परिणाम देशातील इंधन पुरवठ्यावर होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांत घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवू लागला आहे.
महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांना गॅस एजन्सीसमोर रांगा लावाव्या लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विशेषतः कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे नागरिकांना सिलेंडर मिळण्यात अडचणी येत असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. परिस्थिती अशीच राहिल्यास हॉटेल आणि खाद्यव्यवसायावरही मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने ESMA कायदा लागू केला आहे. या कायद्याच्या माध्यमातून आवश्यक वस्तूंची साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच तेल शुद्धीकरण कारखाने आणि पेट्रोकेमिकल कंपन्यांना अधिक प्रमाणात एलपीजी उत्पादन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, जेणेकरून घरगुती आणि व्यावसायिक गॅसचा पुरवठा सुरळीत राहू शकेल.
दरम्यान, ESMA (Essential Services Maintenance Act) हा कायदा भारतीय संसदेने 1968 मध्ये मंजूर केला होता. आपत्कालीन परिस्थितीत अत्यावश्यक सेवांचा पुरवठा खंडित होऊ नये यासाठी या कायद्याचा वापर केला जातो. सार्वजनिक सुरक्षा, जलपुरवठा, रुग्णालये, ऊर्जा, पेट्रोलियम, वाहतूक, बँकिंग आणि दळणवळण यांसारख्या सेवांचा या कायद्याच्या कक्षेत समावेश होतो.
तज्ज्ञांच्या मते, युद्धस्थिती दीर्घकाळ कायम राहिल्यास इंधन आणि गॅस पुरवठ्यावर आणखी ताण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारे परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक उपाययोजना करत आहेत. नागरिकांनीही अनावश्यक साठेबाजी टाळून संयम बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे






















