गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : गेवराई येथील सहदिवाणी (कनिष्ठ स्तर) न्या. एस. एच. पाटील यांच्या न्यायालयाने नुकसान भरपाईच्या प्रकरणात एक महत्त्वपूर्ण व मार्गदर्शक ठरणारा निकाल मंगळवारी दिला. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण) यांना वादी शेतकरी रामनाथ सर्जेराव माळी,( रा.लुखामसला )यांना रुपये ३ लाख ६० हजार तसेच त्यावर ६ टक्के वार्षिक व्याज अदा करण्याचे आदेश दिले. व्याजासह ही रक्कम अंदाजे पाच लाख रुपयांपर्यंत पोहोचत आहे.
वादी रामनाथ माळी यांच्या मालकीच्या तीन म्हशी या घरासमोर शेतामध्ये बांधलेल्या असताना अचानक महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीची तार तुटून म्हशींच्या अंगावर पडली. त्यामुळे म्हशींचा मृत्यू झाला. वीज वितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे म्हशींचा मृत्यू झाल्याचा आरोप करत माळी यांनी २०१९ मध्ये गेवराई न्यायालयात नुकसान भरपाई मिळण्यासाठी दावा दाखल केला होता.
या प्रकरणात महावितरणकडून योग्य ती खबरदारी न घेतल्याने गंभीर नुकसान झाल्याचा मुद्दा न्यायालयासमोर
मांडण्यात आला. न्यायालयाने या प्रकरणातील सर्व कागदपत्रे, पुरावे व साक्षीदारांचे जबाब यांचा सखोल व बारकाईने विचार केला. सुनावणीदरम्यान सादर केलेल्या पुराव्यांवरून प्रतिवादी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड यांचा निष्काळजीपणा झाल्याचे न्यायालयाच्या स्पष्ट निदर्शनास आले. परिणामी न्यायालयाने कंपनीला जबाबदार धरून वादीच्या बाजूने निकाल देत नुकसान भरपाई अदा करण्याचे आदेश दिले. या प्रकरणात वादी शेतकरी रामनाथ सर्जेराव माळी यांच्या वतीने अॅड. स्वप्निल परशुराम येवले यांनी बाजू मांडली. त्यांनी साक्षीदारांची काटेकोर पडताळणी करून तसेच कायदेशीर मुद्द्यांवर ठोस युक्तिवाद सादर करून प्रकरणात यश मिळवले. त्यांना अॅड. सुनील शेजुळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. हा निकाल केवळ एका शेतकऱ्यापुरता मर्यादित नसून, यामुळे शेतकरी व पशुपालकांना अशा प्रकरणी मदत मिळविण्यासाठी मार्गदर्शक ठरेल. शासकीय किंवा खासगी यंत्रणांच्या निष्काळजीपणामुळे नुकसान झाल्यास संबंधितांना जबाबदार धरण्याचा हा एक महत्त्वाचा निर्णय असल्याचे अॅड. स्वप्निल येवले यांनी सांगितले.






















