अनिल वायाळ ( बुलढाणा प्रतिनिधी ) : लोणार तालुक्यातील ग्रामीण भागातून नवोदय प्रवेश परीक्षेत उल्लेखनीय यश मिळाल्याची प्रेरणादायी घटना समोर आली आहे. प्रा. गोपाल मिसाळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली धायफळ येथील समर्थ सुरेश डाके आणि देऊळगाव वायसा येथील पूजा सुदाम राठोड या विद्यार्थ्यांनी जिल्ह्यात अनुक्रमे 50 वा आणि 51 वा क्रमांक पटकावला आहे.
अत्यंत दुर्गम व मर्यादित शैक्षणिक सुविधा असलेल्या छोट्या गावांमध्ये राहूनही या दोन्ही विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. विशेष बाब म्हणजे हे दोघेही विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेचे असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही योग्य मार्गदर्शन आणि मेहनतीच्या बळावर मोठे यश मिळवता येते, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे.
या यशामागे प्रा. मिसाळ सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असून त्यांनी विद्यार्थ्यांना योग्य दिशा देत सातत्याने प्रोत्साहन दिले. त्यांच्या या प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.
समर्थ आणि पूजा यांच्या यशामुळे संपूर्ण लोणार तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या यशाने इतर ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.






















