ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : ग्रामीण भागातील नागरिकांचे महसूल विभागाशी संबंधित प्रश्न स्थानिक पातळीवरच सोडवण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ अभियानांतर्गत मौजा पिंपळगाव येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन अप्पर जिल्हाधिकारी संतोष थिटे व प्रांत अधिकारी पर्वणी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख व गतिमान करण्याच्या उद्देशाने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मंडळ स्तरावर ही शिबिरे आयोजित केली जात आहेत. पिंपळगाव येथील शिबिरात सातबारा उतारा दुरुस्ती, फेरफार नोंदी, जाती व उत्पन्नाचे दाखले, रेशन कार्डमधील त्रुटी तसेच जमिनीचे प्रलंबित वाद यांसारख्या विविध प्रकरणांवर तत्काळ कार्यवाही करण्यात आली.
यावेळी मार्गदर्शन करताना अप्पर जिल्हाधिकारी संतोष थिटे यांनी सांगितले की, सामान्य नागरिकांना छोट्या कामांसाठी तालुक्याच्या ठिकाणी वारंवार जावे लागू नये, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. तक्रारींचा तातडीने निपटारा करून प्रशासनात पारदर्शकता आणण्यावर भर दिला जात आहे.

प्रांत अधिकारी पर्वणी पाटील यांनीही या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्यासाठी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असून ग्रामीण भागातील महिला व विद्यार्थ्यांच्या अर्जांना प्राधान्य दिले जात आहे.
या शिबिरात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या फेरफार व विविध दाखल्यांचे प्रश्न मार्गी लागल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमादरम्यान २२० लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
यावेळी तहसीलदार सतीश मासाळ, नायब तहसीलदार लीना बोभाटे, महानंदा मडावी, तालुका कृषी अधिकारी स्वाती घुले, उपअधीक्षक भूमी अभिलेख गोरखा, दुय्यम निबंधक संजय मडावी यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी, सरपंच, तलाठी, ग्रामसेवक आणि सुमारे ५०० ते ६०० नागरिक उपस्थित होते.






















