गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या रोटरी क्लब ऑफ गेवराई यांच्या वतीने सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त ‘भीमज्योती जन्मोत्सव’ साजरा करण्यात येणार असून, त्याअंतर्गत बीड जिल्हास्तरीय खुल्या निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र बरकसे यांनी केले आहे. रोटरी क्लब स्थापनेच्या पहिल्याच वर्षात सामाजिक, आरोग्य, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवित आहे.
११ एप्रिल रोजी महात्मा ज्योतिराव फुले तर १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असून, या निमित्ताने ‘भीमज्योती उत्सव’ आयोजित करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने “सद्यस्थितीत महात्मा जोतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची आवश्यकता” या विषयावर आधारित निबंध स्पर्धा घेण्यात येणार आहे.
निबंध टंकलिखित किंवा स्वहस्ताक्षरात, जास्तीत जास्त १००० शब्दांमध्ये लिहावा. स्पर्धेसाठी वयोमर्यादा नाही. इच्छुक स्पर्धकांनी आपले निबंध दिनांक २० एप्रिलपर्यंत प्रा. राजेंद्र बरकसे, अध्यक्ष, रोटरी क्लब ऑफ गेवराई, सरस्वती कॉलनी नं. २, ताकडगाव रोड, गेवराई, जि. बीड (४३११२७) या पत्त्यावर पाठवावेत.
स्पर्धेतील पहिल्या पाच विजेत्यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेचा निकाल २५ एप्रिल रोजी जाहीर करण्यात येईल. निबंधाच्या शेवटी स्पर्धकांनी आपले पूर्ण नाव, पत्ता आणि व्हॉट्सअॅप क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. तसेच निबंध कागदाच्या एकाच बाजूस लिहावा.
या स्पर्धेत जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रोजेक्ट चेअरमन धर्मराज करपे व प्रा. रामप्रभू मुंडे यांनी केले आहे.






















