शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) : आदिवासी विद्यार्थी व समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे, या मागणीसाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने आदिवासी विकास मंत्री ना. प्रा. अशोक ऊईके यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात शिक्षण, आरक्षण, जात पडताळणी, तसेच विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश करण्यात आला आहे.
निवेदनात धनगर व बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करू नये, तर त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावे, अशी ठाम भूमिका मांडण्यात आली. तसेच जात पडताळणी प्रक्रियेत १९५० सालचा पुरावा मागितला जात असल्याने दुर्गम भागातील आदिवासी बांधवांना अडचणी येत असून, १९८० पर्यंतचे उपलब्ध पुरावे ग्राह्य धरावेत, अशी मागणी करण्यात आली.
टी.आर.टी. पुणे यांनी जाहीर केलेल्या यादीत तफावत असल्याचा आरोप करत ती यादी पुन्हा गुणवत्तेनुसार प्रसिद्ध करावी व बोगस उमेदवारांवर कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली. स्वयंम योजनेअंतर्गत प्रलंबित अर्ज तातडीने मंजूर करावेत आणि पात्र विद्यार्थ्यांना डीबीटीची थकित रक्कम लवकरात लवकर वितरित करावी, यावरही भर देण्यात आला.
शिरपूर तालुक्यातील शिंगावे येथे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी बस सेवा सुरू करावी, तसेच कोडीद, उमर्दा व लौकी येथील आश्रम शाळांमध्ये इयत्ता ११वी-१२वीच्या अतिरिक्त तुकड्या सुरू कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. उमर्दा, जामन्यापाडा व खर्दे बुगा येथील शाळांसाठी शासकीय जागा व इमारती उपलब्ध करून देण्याची गरजही अधोरेखित करण्यात आली.
या वेळी अॅड. दारासिंग पावरा, अॅड. रतिलाल वसावे, अॅड. समाधान भवरे, अॅड. जयसिंग पावरा, इंजि. किरण पावरा यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.






















