परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) : खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने जिल्ह्यात शेती मशागतीच्या कामांना मोठा वेग आला आहे. पारंपरिक बैलजोडीवर आधारित शेती आता मागे पडत असून, आधुनिक यंत्रसामग्रीकडे शेतकऱ्यांचा कल झपाट्याने वाढताना दिसत आहे. ट्रॅक्टर, रोटर, वखरणी यांसारख्या यंत्रांच्या साहाय्याने शेत तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
शेतकरी सध्या नांगरणी करून जमीन उलथवणे, वखरणीने ढेकळे फोडणे आणि रोटरच्या साहाय्याने माती भुसभुशीत करण्यावर भर देत आहेत. भुसभुशीत मातीमुळे पावसाचे पाणी अधिक काळ टिकून राहते, ज्याचा थेट फायदा पिकांच्या वाढीस होतो. विशेषतः कोरडवाहू शेतीसाठी ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची ठरत आहे.
दरम्यान, शेतातील काडी-कचरा वेचण्याचे काम अजूनही मोठ्या प्रमाणावर महिला मजुरांवर अवलंबून आहे. मात्र मजुरांची टंचाई जाणवत असल्याने शेतकऱ्यांना सकाळीच मजुरांच्या घरी जाऊन विनंती करावी लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची धावपळ आणि मेहनत वाढली आहे.
शेतीच्या वाटण्या होत गेल्याने लहान शेतकऱ्यांनी बैलजोडी मोडीत काढली असून मोठे शेतकरीही यंत्रावर भर देताना दिसत आहेत. उन्हाळी मशागतीच्या कामांना वेग आल्याने ट्रॅक्टर भाड्याने वेळेत मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे ट्रॅक्टर मालकांनी चालकांची संख्या वाढवून रात्रंदिवस मशागतीची कामे सुरू ठेवली आहेत.
एकूणच, बदलत्या काळानुसार परभणी जिल्ह्यात शेतीचे स्वरूप झपाट्याने बदलत असून, यंत्राच्या वाढत्या वापरामुळे शेती अधिक गतिमान होत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.






















