Times Of Maharashtra Desk : मुंबई गोदरेज उद्योग समूह या १२९ वर्षांच्या परंपरा असलेल्या समूहाने आपली नवी ब्रँड ओळख आणि भविष्यातील धोरण जाहीर केले. मुंबईतील मुख्यालयात झालेल्या बैठकीत समूहाच्या विविध व्यवसायांना एकत्रित ओळख देण्यासाठी हा बदल करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
समूहाने नवीन ध्येयवाक्य जाहीर करत विश्वास, आनंद आणि धाडस या मूल्यांवर भर दिला आहे. संस्थापक अर्देशीर गोदरेज यांच्या विचारांपासून प्रेरणा घेत ही दिशा निश्चित करण्यात आली असल्याचे कंपनीने स्पष्ट केले. नव्या ओळखीमुळे समूहाच्या कंझ्युमर प्रॉडक्ट्स, रिअल इस्टेट, फायनान्शिअल सर्व्हिसेस, ॲग्रीकल्चर आणि केमिकल्स या सर्व व्यवसायांना एकसंध दिशा मिळणार आहे.
आर्थिक कामगिरीच्या बाबतीत, गेल्या पाच वर्षांत समूहाने २० टक्क्यांपेक्षा जास्त चक्रवाढ वार्षिक वाढ नोंदवली आहे. या पार्श्वभूमीवर पुढील काळात १५ टक्क्यांपेक्षा जास्त विक्री वाढ आणि २० टक्क्यांपेक्षा जास्त ईपीएस वाढ साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्रत्येक व्यवसायातून १८ टक्क्यांपेक्षा जास्त इक्विटी परतावा मिळवण्यावरही भर दिला जाणार आहे. तसेच समूहाच्या सूचीबद्ध कंपन्यांची संख्या तीनवरून पाचपर्यंत वाढवण्याचा मानस असून, पुढील पाच वर्षांत एकूण मार्केट कॅपिटलायझेशन ₹५ लाख कोटींपर्यंत नेण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
पर्यावरण आणि सामाजिक जबाबदारी लक्षात घेऊन समूहाने २०३५ पर्यंत नेट-झिरो ऑपरेशन्स आणि २०४५ पर्यंत प्लॅनेट-पॉझिटिव्ह सप्लाय चेनचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. याशिवाय, संस्थेमध्ये महिला, LGBTQ+ समुदाय आणि दिव्यांग व्यक्तींचे प्रतिनिधित्व वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. परोपकारी उपक्रमांसाठीचा खर्चही वाढवण्याची घोषणा करण्यात आली.
या वेळी पिरोजशा गोद्रेj यांनी वाढ आणि जबाबदारी यांचा समतोल राखण्यावर भर दिला, तर तान्या दुबाश यांनी नवी ब्रँड ओळख ही समूहाच्या भविष्यातील दृष्टीचे प्रतीक असल्याचे सांगितले.






















