लोणेरे-अलिबाग (प्रतिनिधी जयेंद्र मुंढे) :
रायगड जिल्ह्यात खळबळ उडवणाऱ्या लोणेरे येथील पल्लवी मोरे हत्याकांडाचा तपास आता निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अनिस मोहम्मद खान मालदार याला न्यायालयाने पोलीस कोठडीनंतर आता न्यायालयीन कोठडीत पाठवले असून, त्याच्यावर गंभीर आणि कठोर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१९ एप्रिल रोजी घडलेल्या या भीषण घटनेचा उलगडा २० एप्रिलला झाला होता. तपासात तरुणीवर अमानुष अत्याचार करून तिची हत्या केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपीला २६ एप्रिल रोजी ठाणे परिसरातून अटक केली होती. त्यानंतर त्याची कसून चौकशी करण्यात आली. पुढील कायदेशीर प्रक्रियेनंतर न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 66/2026 नोंदवण्यात आला असून, भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1), 64 तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील कलम 3(2)(V) आणि 3(1)(w)(i)(ii) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कठोर तरतुदींमुळे आरोपीला कडक शिक्षा होण्याची शक्यता बळावली आहे.
घटनेनंतर संपूर्ण रायगड जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून, विविध सामाजिक संघटना, नागरिक आणि राजकीय पक्षांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे.
दरम्यान, अलिबाग येथे पार पडलेल्या जिल्हा विकास समन्वय समितीच्या बैठकीतही या प्रकरणाचा मुद्दा चर्चेत राहिला. प्रतिनिधी रविंद्र मोरे यांनी पीडित कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी अनुभवी सरकारी वकील अँड. प्रसाद शांताराम पाटील यांची नियुक्ती करण्याची मागणी केली. तसेच कुटुंबाला आर्थिक मदत, घरकुल आणि शासकीय नोकरी देण्याचीही मागणी पुढे आली.
तपासात काही महत्त्वाचे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. गुन्ह्याची अचूक पार्श्वभूमी, संभाव्य सहआरोपी, वापरलेले हत्यार आणि लॉजमध्ये सीसीटीव्ही नसणे या बाबी गंभीर ठरत आहेत.
हे प्रकरण आता केवळ एक गुन्हा न राहता समाजाच्या सुरक्षिततेचा आणि न्यायव्यवस्थेवरील विश्वासाचा मुद्दा बनले आहे. आरोपी अटकेत असला तरी अंतिम न्याय मिळेपर्यंत संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या खटल्यावर खिळून राहणार आहे.






















