Times Of Maharashtra Desk :
दौंड : नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्येच्या घटनेविरोधात राज्यभर संताप व्यक्त होत असताना, दौंडमध्येही या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP), बारामती जिल्हा अंतर्गत दौंड शाखेच्या वतीने या घटनेचा निषेध नोंदवत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.
दि. ४ मे २०२६ रोजी दौंड येथील तहसीलदारांच्या मार्फत मा. राष्ट्रपती यांना निवेदन पाठविण्यात आले. या निवेदनात पीडित चिमुकलीला तातडीने न्याय मिळावा तसेच संबंधित आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
या प्रसंगी ओंकार तीखे (टीसी कॉलेज को-इन्चार्ज) आणि मल्हार काकडे (वसंतराव पवार विधी महाविद्यालय उपाध्यक्ष) यांच्यासह ABVP चे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी या अमानवी घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत, समाजात अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा बसण्यासाठी शासनाने कठोर भूमिका घेण्याची गरज व्यक्त केली.
या निवेदनाद्वारे केवळ निषेध नोंदविण्यापेक्षा, दोषींना तातडीने शिक्षा होऊन भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली.






















