गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड): हरवलेली पाखरे येतील का रे पुन्हा भेटायला, ते गेलेले क्षण सजवायला. आयुष्याच्या पुस्तकातील ते अनमोल क्षण मिळतील का रे पुन्हा जगायला. या भावनिक शब्दांत तब्बल २७ वर्षांनंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साष्ट पिंपळगाव (ता. अंबड) येथील सन १९९७-९८ च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा सोमवारी गेवराई येथील हाँटेल निसर्ग येथे उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी के.के.सोनवणे सर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सखाराम नाटकर पत्रकार विनोद नरसाळे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन करुन करण्यात आली. यानंतर के.के.सोनवणे, नाटकर सर, ठेंगल सर, ढवळे सर, एरंडे सर, गवळी, जाधव सर, मोराळे सर, मरपडवाड सर, नरवटे सर, पवार सर या आदर्श ज्येष्ठ शिक्षकांचा सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
आज आम्ही जे काही आहोत ते फक्त शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळेच, तुम्ही केलेल्या संस्कारामुळे, अशा भावना व्यक्त करत माजी विद्यार्थ्यांनी गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल समाधान व्यक्त करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. दरम्यान दीर्घ कालावधीनंतर एकमेकांना भेटताना अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. शाळेतील वर्ग, शिक्षकांची शिस्त, मित्रांसोबत केलेली धमाल, सहली, खेळ आणि अभ्यासातील गमती-जमती यांची आठवण काढताना वातावरण भावनिक झाले होते.
दरम्यान विविध क्षेत्रात कार्यरत असलेले पोलिस, डॉक्टर, शिक्षक, शासकीय कर्मचारी, व्यावसायिक व उद्योजक असलेले हे माजी विद्यार्थी पुन्हा एकदा बालमित्रांच्या आठवणीसह सहवासात रमले होते. जुन्या फोटोंना उजाळा, हास्यविनोद, गप्पा आणि आठवणींनी संपूर्ण वातावरण भारावून गेले होते. यावेळी शिक्षकांनी गाव व विद्यार्थ्यांनी दिलेला आदरयुक्त सहवासाबद्दल तर अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करुन शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला.
या स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने सर्वांनी पुढील काळातही एकमेकांशी संपर्क कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन शिंदे यांनी केले, तर आभार ज्ञानदेव चोरमारे, यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक किरण औटे, विवेक माने, गजानन शिंदे, नंदकिशोर कामे, ज्ञानेश्वर बोचरे, विश्वनाथ गायकवाड, मैना चिंतामणी, मनिषा दाभाडकर, सविता ढोले, अयोध्या झिंझुर्डे, सुलोचना गायकवाड यांनी परिश्रम घेतले. हा स्नेहमेळावा अत्यंत उत्साहात पार पडला. या मेळाव्याला जवळपास ७० हून अधिक माजी विद्यार्थी उपस्थित होते.






















