अहेरी(प्रतिनिधी जाबिर खान): भामरागड-अहेरी परिसरातील आरोग्य व्यवस्थेतील अपुऱ्या सुविधा आणि रुग्णालयांमधील समन्वयाच्या अभावाचा गंभीर प्रकार समोर आला आहे. प्रसूतीकळा सुरू झाल्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या जन्नी पुसू नैताम या गर्भवती महिलेचा रुग्णालयात नेत असतानाच दुर्दैवी मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे मृत्यूनंतरही त्यांच्या मृतदेहाला शवविच्छेदनासाठी तब्बल १४ तास प्रतीक्षा करावी लागली.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री सुमारे ९ वाजता जन्नी नैताम यांना प्रसूतीकळा सुरू झाल्याने भामरागड येथील ग्रामीण आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. आवश्यक वैद्यकीय सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याने त्यांना अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, अहेरीला पोहोचण्यापूर्वीच वाटेत त्यांचा मृत्यू झाला.
यानंतर मृतदेह अहेरी येथील महिला व बाल रुग्णालयात नेण्यात आला. मात्र, शवविच्छेदनासाठी डॉक्टर उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आल्याने मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. तेथेही हे प्रकरण महिला व बाल रुग्णालयाशी संबंधित असल्याचे कारण देत शवविच्छेदनास विलंब झाल्याचे सांगण्यात आले. परिणामी मृतदेह अनेक तास शवविच्छेदनाच्या प्रतीक्षेत राहिला.
या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर पत्रकार जावेद अली व त्यांच्या सहकाऱ्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांशी संपर्क साधला. त्यानंतर विशेष डॉक्टरांची टीम अहेरीकडे रवाना करण्यात आली. अखेर दुपारी सुमारे २ वाजता शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती आहे.
या घटनेमुळे भामरागड, अहेरी आणि सिरोंचा या दुर्गम भागांतील आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. तज्ज्ञ डॉक्टर, आवश्यक उपकरणे, आपत्कालीन सेवा आणि रुग्णालयांमधील समन्वय सक्षम करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. या घटनेची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणीही होत आहे.






















