विनोद पवार (जळगाव प्रतिनिधी )
शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या शासकीय योजनाच लाचखोरीच्या विळख्यात अडकल्याचा धक्कादायक प्रकार पाचोरा येथे समोर आला आहे. शेती साहित्यावरील अनुदान मंजूर करून देण्यासाठी लाच मागणाऱ्या कृषी अधिकाऱ्यांवर जळगाव एसीबी पथकाने थेट कारवाई करत मोठा सापळा रचला आहे.
या कारवाईत पाचोरा कृषी कार्यालयातील उप कृषी अधिकारी लिलाधर देशमुख यांनी शेतकऱ्याकडून ६ हजार रुपयांची मागणी करून तडजोडीनंतर ५ हजार रुपये स्वीकारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
आंबेवडगाव (ता. पाचोरा) येथील एका शेतकऱ्याने शासनाच्या कृषी योजनेअंतर्गत नांगर व रोटर खरेदीसाठी अनुदान मिळावे म्हणून ऑनलाइन अर्ज केला होता. मात्र अर्ज मंजूर करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याने थेट लाचेची मागणी केल्याचा आरोप शेतकऱ्याने केला. यानंतर शेतकऱ्याने धाडस दाखवत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
तक्रारीच्या आधारे एसीबीने सापळा रचला. या वेळी व्यावसायिक संजय पाटील गैरहजर असल्याने, त्याच्या सांगण्यावरून नितीन निकम याने लाचेची रक्कम स्वीकारली आणि त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. देशमुख, संजय पाटील व नितीन निकम यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही संपूर्ण कारवाई नाशिक पोलीस परिक्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, या प्रकरणामुळे कृषी विभागासह संपूर्ण शासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.






















