Times of Maharashtra desk, Ahilyanagar: मागील काही महिन्यांपासून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये बिबट्यांकडून मानवी वस्तीवरील हल्ल्यामध्ये मोठी वाढ झाली असून लहान मुलांवर हल्ल्यांच्या घटना सातत्याने घडत आहेत. ग्रामीण भागासह काही शहरी भागातील नागरिक देखील या वाढत्या बिबट हल्ल्यांमुळे भयभीत झाले आहेत. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने परिस्थिती अत्यंत गंभीर बनत असल्याने अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी तातडीची उपाययोजना म्हणून बिबट प्रवण आपत्ती क्षेत्रातील सर्व शाळांच्या वेळेत बदल करण्याचे आदेश जारी केले आहेत.
नगर जिल्ह्यात प्राथमिक शाळा एक किमी आणि उच्च प्राथमिक शाळा तीन किमी अंतरावर उपलब्ध असल्या तरी बहुतांश विद्यार्थी पायीच शाळेत ये-जा करतात. दरम्यानच्या मार्गावर ऊस शेती, जंगल पट्टे, डोंगराळ भाग आणि बिबट प्रवण क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत धोका निर्माण झाला आहे. सध्या ऊसतोडीमुळे जिल्ह्यातील ऊस क्षेत्र कमी झाल्याने बिबट्यांची हालचाल अधिक खुली झाली असून हल्ल्यांचे प्रमाण वाढल्याचे प्रशासनाचे निरीक्षण आहे. त्यातच हिवाळा ऋतूमुळे संध्याकाळी लवकर अंधार पडत असल्याने विद्यार्थी घरी परतताना धोका आणखी वाढला आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी सकाळी ९.३० ते दुपारी ४.०० या वेळेत शिक्षण व दैनंदिन कामकाज सुरू ठेवावे असे आदेश दिले आहेत. शाळा व्यवस्थापन समिती किंवा शाळा समितीची मंजुरी घेतल्यानंतर हा बदल लागू करता येणार आहे. जिल्ह्यातील सर्व गटशिक्षण अधिकाऱ्यांना या आदेशांची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
तसेच, तात्काळ जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये सकाळच्या परिपाठात विद्यार्थ्यांना सुरक्षिततेबाबत उद्बोधन करण्याचे निर्देश दिले गेले आहेत. शाळा सुटताना पालकांनी आपल्या पाल्यांना स्वतःसोबत घेऊन जाण्यास प्राधान्य द्यावे, यासाठी पालक मेळावे घेण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. प्रत्येक विद्यार्थी सुरक्षितरीत्या घरी पोहोचल्याची खात्री वर्गशिक्षकांनी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
याशिवाय, शालेय स्तरावरील विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकास समित्यांच्या सभा दरमहा घेऊन अतिरिक्त सुरक्षात्मक उपाययोजना राबवण्याची गरजही जिल्हाधिकाऱ्यांनी अधोरेखित केली आहे. तालुक्यातील किती शाळांनी वेळेत बदल केला आहे, याचा अहवाल गट शिक्षण अधिकाऱ्यांनी तातडीने शिक्षणाधिकाऱ्यांना सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
बिबट्यांच्या धोक्यापासून विद्यार्थ्यांचे प्राण वाचवण्यासाठी प्रशासनाने घेतलेली ही पावले अत्यंत महत्त्वाची ठरत असून पुढील काही दिवसांत शाळा व्यवस्थापन आणि पालक यांच्या सक्रिय सहभागाची गरज अधिक वाढली आहे.






















