Times of Maharashtra: रेल्वे स्थानकांवरील सुरक्षेसाठी तंत्रज्ञानाचा वापर किती प्रभावी ठरू शकतो, याचे एक उत्तम उदाहरण विशाखापट्टणम रेल्वे स्थानकावर पाहायला मिळाले. येथील ‘एएससी अर्जुन’ (ASC Arjun) या एआय (AI) आधारित ‘रेल रोबोकॉप’ने आपल्या फेशियल रेकग्निशन सिस्टमच्या (FRS) मदतीने दोन सराईत गुन्हेगारांना ओळखले आणि त्यांना जेरबंद करण्यात रेल्वे पोलिसांना यश आले. ही घटना सोमवारी (२ फेब्रुवारी २०२६) रात्री घडली.
नेमकी घटना काय?
सोमवारी रात्री ८:१० च्या सुमारास ‘एएससी अर्जुन’ रोबो विशाखापट्टणम स्थानक परिसरात नेहमीप्रमाणे गस्त घालत होता. गस्तीदरम्यान एका संशयास्पद व्यक्तीचा चेहरा स्कॅन करताच, रोबोच्या सिस्टीममध्ये आधीच लोड केलेल्या गुन्हेगारांच्या डेटाबेसशी तो चेहरा जुळला. ‘फेस मॅच’ होताच या हायटेक रोबोने त्वरित आरपीएफच्या (RPF) सीसीटीव्ही कंट्रोल रूमला अलर्ट पाठवला.
हा अलर्ट मिळताच ड्युटीवर असलेले हेड कॉन्स्टेबल बी.एस. नारायण यांनी लाईव्ह फुटेज तपासले. त्यांनी तात्काळ सब-इन्स्पेक्टर व्ही. कीर्ती रेड्डी आणि वॉल्टेअर डिव्हिजनच्या गुन्हे प्रतिबंधक पथकाला (CPDS) माहिती दिली. या पथकाने क्षणाचाही विलंब न लावता कारवाई केली आणि दोन संशयितांना ताब्यात घेतले.
अटक केलेल्या गुन्हेगारांची पार्श्वभूमी
आरपीएफने अटक केलेल्यांची नावे हडपा शिवा (३९ वर्षे) आणि जी. भंगारू अशी आहेत. चौकशीदरम्यान त्यांच्याकडे प्रवासाचे कोणतेही वैध तिकीट आढळले नाही. जेव्हा आरपीएफने त्यांची सखोल चौकशी केली, तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली. हे दोन्ही आरोपी रायगड पोलीस ठाण्यातील नोंदीनुसार ‘सराईत गुन्हेगार’ आहेत. त्यांच्यावर चोरी, लूटमार, दरोडा, हाणामारी आणि शस्त्रास्त्रांशी संबंधित अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
हे आरोपी विना तिकीट स्थानकात फिरत असल्याने त्यांच्यावर भारतीय रेल्वे कायदा, १९८९ (सुधारित २००३) अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
रेल्वे सुरक्षेसाठी तंत्रज्ञान वरदान
या यशस्वी कारवाईबद्दल बोलताना पूर्व किनारा रेल्वेचे महाव्यवस्थापक परमेश्वर फुंकवाल म्हणाले की, “ही घटना प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे वापरत असलेल्या तंत्रज्ञानाची उपयुक्तता सिद्ध करते. ‘एएससी अर्जुन’च्या एआय (AI) आधारित निगराणीमुळे आणि अचूक ओळखीमुळे रेल्वे सुरक्षा यंत्रणांना वेळीच कारवाई करणे शक्य झाले.”
रेल्वे स्थानकावर तैनात करण्यात आलेला हा ‘एएससी अर्जुन’ रोबो प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.






















