आशिष कोटकर ( वरोरा भद्रावती प्रतिनिधी ) : तालुक्यातील अर्जुनी तुकुम येथील ग्रामपंचायतीचा गलथान कारभार सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. गावातील बहुतांश नागरिक हे शेतकरी व शेतमजूर असल्यामुळे पिण्याचे पाणी सकाळी लवकर किंवा सायंकाळनंतर सोडणे गरजेचे असताना, ग्रामपंचायतीकडून भर दुपारी पाणीपुरवठा केला जात असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे.
गावात एक दिवसाआड नळाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र नियोजनाच्या अभावामुळे हा पुरवठा नागरिकांच्या उपयोगाचा ठरत नसल्याचे चित्र आहे. विशेषतः महिलावर्ग दुपारच्या वेळी शेतात कामासाठी गेलेला असल्याने त्या वेळेत सोडलेले पाणी वाया जात असून हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. यामुळे पाण्याची तीव्र टंचाई असताना देखील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.
याशिवाय पाण्याच्या टाकीजवळील वाल्वमधूनही मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असल्याची बाब समोर आली आहे. या गळतीमुळे केवळ पाण्याचा अपव्ययच होत नाही, तर ग्रामपंचायतीवर आर्थिक भारही वाढत असल्याची चर्चा आहे. उन्हाळ्याची सुरुवात होत असतानाच अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.
मंगळवारी भर दुपारी सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पुन्हा एकदा हजारो लिटर पाणी वाया गेल्याची घटना घडली. त्यामुळे संतप्त नागरिकांनी ग्रामपंचायतीच्या नियोजनशून्य कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
नागरिकांची मागणी आहे की, पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक व्यवस्थित ठरवून सकाळी किंवा सायंकाळीच पाणी सोडावे, तसेच गळती तात्काळ दुरुस्त करावी. अन्यथा, येत्या काळात आंदोलनाचा इशारा देखील ग्रामस्थांनी दिला आहे.






















