विनोद पवार ( जळगाव प्रतिनिधी ) : जिल्ह्यातील जामनेर तालुका अंतर्गत बेटावद बुद्रुक परिसरातील शेतकरी अतिवृष्टीच्या मदतीसाठी गेल्या पाच महिन्यांपासून प्रतीक्षेत असून, प्रशासनाच्या दिरंगाईमुळे त्यांच्यात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
30 ऑक्टोबर 2025 रोजी झालेल्या ढगफुटी सदृश्य अतिवृष्टीमुळे या भागातील शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. 30 ऑक्टोबरच्या रात्रीपासून 1 नोव्हेंबरच्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाने संपूर्ण परिसराला अक्षरशः झोडपून काढले. या पावसामुळे कापूस, सोयाबीन, मका, तूर, उडीद, मूग यांसारख्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. विशेषतः मका पिके पूर्णपणे वाहून गेल्याने अनेक शेतकऱ्यांचे उत्पादन निम्म्यावर आले आहे.
या नुकसानीनंतर महसूल व कृषी विभागाकडून पंचनामे करून अहवाल शासनाकडे पाठवण्यात आला होता. विविध राजकीय नेते व शेतकरी प्रतिनिधींनीही बाधित भागाची पाहणी करत तातडीने मदत देण्याची मागणी केली होती. मंत्री गिरीश महाजन यांनीही प्रशासनाला त्वरित सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार शेतकऱ्यांची बँक माहितीही अद्ययावत करण्यात आली.
मात्र, पंचनामे पूर्ण होऊनही अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा झालेली नाही. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यातच पीक नुकसानीची टक्केवारी 50 टक्क्यांपेक्षा कमी दाखवण्यात आल्याने विमा कंपन्यांकडूनही नुकसान भरपाई मिळालेली नाही. परिणामी शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढवले आहे.
दरम्यान, बेटावद बुद्रुक येथे शेतकरी संघटनेतर्फे सुभाष ठोंबरे यांनी विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण केले होते. उपोषणावेळी प्रशासनाने लवकरात लवकर मदत जमा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्यापही त्याची पूर्तता झालेली नाही.
उत्पादन घटले असून बाजारभावही घसरले आहेत, त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले आहेत. शासनाने तात्काळ मदत वितरित करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे.






















