Times of Maharashtra Desk : बांगलादेशची राजधानी ढाका येथील भारतीय दूतावासाबाहेर सुरू असलेल्या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर आणि सुरक्षेबाबत वाढत्या चिंतेमुळे भारत सरकारने बुधवारी दिल्लीतील बांगलादेश उच्चायुक्तांना परराष्ट्र मंत्रालयात बोलावले. या बैठकीत ढाका येथील भारतीय दूतावासाच्या सुरक्षेचा मुद्दा आणि अलीकडील घडामोडींवर भारताची तीव्र चिंता अधिकृतपणे व्यक्त करण्यात आली आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने भारतातील बांगलादेश उच्चायुक्त एम. रियाझ हमीदुल्ला यांना पाचारण केले. सूत्रांच्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून भारतीय दूतावासाबाहेर सुरू असलेल्या निदर्शनांमुळे दूतावासाच्या सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण झाले असून, या संदर्भात बांगलादेश सरकारकडून स्पष्ट भूमिका आणि आवश्यक सुरक्षात्मक उपायांची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार , ढाका येथील भारतीय दूतावासाबाहेर सतत होत असलेल्या आंदोलनांमुळे परिस्थिती संवेदनशील बनली आहे. या पार्श्वभूमीवर भारताने बांगलादेश सरकारला परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याची आणि दूतावास तसेच कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची हमी देण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, बांगलादेशच्या नॅशनल सिटीझन्स पार्टी (एनसीपी)चे नेते हसनत अब्दुल्ला यांच्या भारतविरोधी वक्तव्यांमुळेही तणाव वाढला आहे. एका जाहीर भाषणात त्यांनी भारताच्या ईशान्येकडील राज्यांबाबत आक्षेपार्ह विधान करत फुटीरतावादी घटकांना आश्रय देण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. हसनत अब्दुल्ला हे त्यांच्या कट्टर भारतविरोधी भूमिकेसाठी ओळखले जातात.
ही घटना बांगलादेशच्या विजय दिनानंतर लगेचच घडली आहे, हे विशेष उल्लेखनीय आहे. १९७१ च्या युद्धातील विजय आणि बांगलादेशच्या स्वातंत्र्याच्या स्मरणार्थ साजरा करण्यात येणाऱ्या विजय दिनाच्या एक दिवस आधी परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी बांगलादेशला शुभेच्छा दिल्या होत्या. त्यांनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर)वर लिहिले होते, “परराष्ट्र व्यवहार सल्लागार मोहम्मद तौहिद हुसेन, अंतरिम सरकार आणि बांगलादेशच्या जनतेला विजय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.”
या पार्श्वभूमीवर भारत-बांगलादेश संबंधांमध्ये निर्माण झालेल्या तणावाकडे दोन्ही देशांचे लक्ष लागले असून, परिस्थिती शांततापूर्ण मार्गाने सोडवण्यासाठी राजनैतिक पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत.






















