जळगाव प्रतिनिधी विनोद पवार: भुसावळ तालुक्यातील साक्री गावात सोमवारी एक अत्यंत हृदयद्रावक आणि संतापजनक घटना घडली आहे. ट्युशनसाठी घराबाहेर पडलेल्या नववीतील दोन अल्पवयीन विद्यार्थिनींचे मृतदेह गावाजवळील एका शेतातील विहिरीत आढळून आले. याप्रकरणी पोलिसांनी रोहन नरेंद्र चौधरी या तरुणाला ताब्यात घेतले असून, त्याने दोघींना विहिरीत ढकलल्याची कबुली दिली आहे.
नेमकी घटना काय?
मृत विद्यार्थिनी लक्ष्मी अभय महाजन (१५) आणि नयना विजय चौधरी (१५) या साक्री येथील जनता हायस्कूलमध्ये इयत्ता नववीत शिकत होत्या. सोमवारी सकाळी ७:४५ च्या सुमारास त्या ट्युशनसाठी निघाल्या होत्या. मात्र, त्या वर्गात न पोहोचल्याने पालकांनी शोध सुरू केला. ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्या एका तरुणासोबत दुचाकीवर ‘ट्रिपल सीट’ जाताना दिसल्या. सकाळी ९ वाजेच्या सुमारास सोपान फेगडे यांच्या शेतातील विहिरीजवळ मुलींच्या शालेय बॅगा सापडल्याने एकच खळबळ उडाली.
ग्रामस्थांचा आक्रोश आणि ठिय्या आंदोलन
घटनेची माहिती मिळताच पोलीस दल आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिक मुकेश कोळी यांनी दीड तासांच्या अथक प्रयत्नांनंतर दोन्ही मृतदेह बाहेर काढले. मात्र, आरोपीला तातडीने अटक करा आणि त्याला आमच्या ताब्यात द्या, या मागणीसाठी संतप्त ग्रामस्थांनी रुग्णवाहिका अडवून धरली. सुमारे सहा तास साक्री परिसरात तणावपूर्ण वातावरण होते. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत आरोपीला ताब्यात घेतले असल्याचे स्पष्ट केल्यानंतरच मृतदेह विच्छेदनासाठी हलवण्यात आले.
आनंदाचा सत्कार अन् दुखाचा डोंगर
विशेष म्हणजे, अवघ्या काही दिवसांपूर्वीच २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनी या दोन्ही मुलींनी सांस्कृतिक कार्यक्रमात उत्कृष्ट नृत्य आणि लेझीम सादरीकरण केले होते. त्यांच्या या कामगिरीबद्दल ग्रामस्थांनी त्यांचा सत्कारही केला होता. ज्या मुलींच्या यशाचे कौतुक संपूर्ण गाव करत होते, त्यांच्यावर काळाने असा घाला घातल्याने संपूर्ण साक्री गाव सुन्न झाले आहे.
या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त होत असून, नराधम आरोपीवर कठोर कारवाई करून पीडित कुटुंबाला जलद न्याय मिळवून देण्याची मागणी करण्यात येत आहे.



















